स्त्री चळवळीचा प्रभाव: सांस्कृतिक क्षेत्र

करुणा गोखले स्त्री चळवळ
१३ जून २०२५

स्त्री चळवळीचा सांस्कृतिक क्षेत्रावरील प्रभाव तपासायचा, तर सर्वप्रथम सांस्कृतिक म्हणजे काय हे नक्की करावे लागते. मानवी जीवनाच्या सांस्कृतिक
अंगामध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?
समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते कुठल्याही जनसमूहाच्या संस्कृतीत सर्वसाधारणपणे खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो :
धार्मिक श्रद्धा-विश्वास- देवधर्म
सण-समारंभ-उत्सव
स्थानिक खाद्यसंस्कृती
लिंगविशिष्ट रूढी-परंपरा
विवाहसंस्था
जातिव्यवस्था आणि वर्ग-वर्णव्यवस्था
साहित्य
दृश्य कला
ललित कला
करमणूक व्यवसाय
लैंगिकता
LGBTQIA, समाज आणि शासन
स्त्री-पुरुषांच्या फॅशन्स
स्त्री-पुरुषांच्या वैयक्तिक मूल्यव्यवस्था- पारंपरिक व बदलत्या
वरीलपैकी साहित्य आणि कला ही क्षेत्रे एवढी विस्तृत आहेत की, त्यांना स्वतंत्र क्षेत्रे मानून त्यांमधील उपक्षेत्रांचा परामर्श दोन निराळ्या विभागांमध्ये करण्याचे ठरले आहे व म्हणून त्यांना ‘सांस्कृतिक क्षेत्र’ या विभागातून वगळण्यात येत आहे.

सांस्कृतिक व्यवहार-व्यक्ती आणि समष्टी या पातळ्यांचे भान

नास्तिकतावादाचा जीव तोडून प्रसार करणारे सुप्रसिद्ध ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स एका मुलाखतीत म्हणाले होते की, “मी नास्तिक आहे; मी
धर्माने नाही, पण सांस्कृतिकदृष्ट्या ख्रिश्चन आहे.”
हे काय गौडबंगाल आहे? “मी ख्रिश्चन नाही”, असे जाहीर करणारा शास्त्रज्ञ स्वत:ला सांस्कृतिक ख्रिश्चन कसा काय म्हणवून घेतो? यात अंतर्विरोध नाही
का?
नाही, अजिबातच नाही. याचे कारण संस्कृतीचा विचार करताना लक्षात ठेवावे लागते की, समाजाचे सांस्कृतिक व्यवहार समष्टी आणि व्यक्ती अशा दोन पातळ्यांवर सुरू असतात व दोन्ही पातळ्या एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. सामाजिक पातळीवरील सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव व्यक्तींवर पडत असतो. कधी तो व्यक्तीकडून स्वेच्छेने स्वीकारला जातो, तर कधी त्याविषयी नाराजी असते. म्हणूनच बरेचदा माणसाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तनात वरकरणी विरोधाभास निर्माण होतो, असे वाटते. हे विशेषकरून श्रद्धा-विश्वास-देवधर्म आणि सण-समारंभ-उत्सव या मुद्द्यांस लागू पडते. श्रद्धा-विश्वास-देवधर्म हे पूर्णपणे व्यक्तिगत असतात. मात्र, जेव्हा कुठल्याही समाजातील एक मोठा समूह समान श्रद्धा-विश्वास-देवधर्म यांनी जोडलेला असतो, तेव्हा त्याचे श्रद्धा-विश्वास हे सामाजिक पातळीवर सण-समारंभ-उत्सव यांमधून व्यक्त होतात. पैकी सण आणि समारंभ कौटुंबिक पातळीवर, तर उत्सव अधिक विस्तृत अशा सामूहिक प्रमाणात साजरे केले जातात. थोडक्यात, ते सामाजिक पर्यावरणाचा भाग बनतात. त्या पर्यावरणाच्या कक्षेत जो राहतो, तो त्याच पर्यावरणात श्वास घेत असतो. एखाद्या व्यक्तीला तिच्या भोवतालात भरून राहिलेल्या श्रद्धा-विश्वास-देवधर्म यांविषयी व्यक्तिशः आस्था असो, वा नसो, त्या समाजाचा एक घटक म्हणून ती त्या समाजातील सण-समारंभ-उत्सव यांपासून अलिप्त राहू शकत नाही. कधी त्यांमधील सामाजिकता तिला भावते म्हणून ती त्यांमध्ये स्वेच्छेने सामील होते, कधी ती तिच्या व्यावसायामुळे अपरिहार्यपणे त्यांच्याशी जोडलेली असते, तर कधी त्यांचा प्रभाव तिला टाळताच येत नाही, म्हणून तो तिला मान्य करावा लागतो. पाण्यात राहून माशांना टाळता येत नाही, तसाच हा प्रकार असतो.

याचे अगदी परिचयाचे उदाहरण म्हणजे हिंदूबहुल समाजात व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक, हिंदू असो वा इतर धर्मीय; सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, होळी, दिवाळी यांसारखे सण तिच्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम करतच असतात, कारण घराबाहेर पाय टाकताच बाहेरच्या वातावरणात हे उत्सव सार्वजनिक सुट्टी, विशिष्ट पदार्थांची रेलचेल, सणासुदीच्या दिवसात रस्त्यांवर ओसंडून वाहणारी गर्दी, बाजारात विशिष्ट मालानी ओसंडून वाहणारी दुकाने, सहकाऱ्यांकडून घरगुती आमंत्रणे वा भेटवस्तू, घराघरांमधून होणारे पर्यटनाचे आणि सुट्ट्यांचे बेत या रूपांत तिच्या आयुष्याला भिडत असतात. हे सगळे त्या समाजाच्या संस्कृतीचा भाग असतात.

संस्कृती ही अपरिहार्यपणे सामूहिक असते, त्यात वैयक्तिक इच्छा-अनिच्छा आणि श्रद्धा-विश्वास व्यक्त करण्यावर मर्यादा पडतात. ते अट्टाहासाने व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा व्यक्तीला कुटुंबाकडून किंवा समाजाकडून विरोध होण्याचा धोका पत्करावा लागतो. या अर्थाने संस्कृतीचा व्यक्तीवर धाक असतो, असे म्हणता येईल. हा धाक केवळ धार्मिक बाबतीतच असतो असे नाही. संस्कृतीची कुठलीही उपांगे घ्या, त्यात भोवतालच्या संस्कृतीस अमान्य असे काही हातून घडल्यास व्यक्तीला त्याचा जाब विचारला जातो किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तिला शासन केले जाते. जातिव्यवस्था तोडून दुसऱ्या जातीत विवाह केल्यास दोन्ही कुटुंबांचा किंवा आपापल्या जातभाईंचा रोष सहन करावा लागतो. विवाहसंस्थेच्या प्रचलित रिवाजास छेद देऊन पुरुष पत्नीच्या घरी जाऊन राहिला किंवा तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष घालू लागला तर त्याची ‘घरजावई’ म्हणून कुचेष्टा होते. समाजातील लब्धप्रतिष्ठित व्यक्तीच्या विरोधात काही लेखन केल्यास लेखकावर खटला भरला जातो, किंवा त्याच्या तोंडाला काळे फासले जाते. भिन्नलिंगी व्यक्तीऐवजी समलिंगी
व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असेल, तर गुन्हेगार किंवा वेडे ठरवले जाते. इतकेच कशाला, ज्या स्त्रीला नटण्या-मुरडण्याची आवड नसेल, तिला पुरुषी किंवा विक्षिप्त म्हणून हिणवले जाते आणि मुलांच्या आठवणीने वरचेवर गहिवरणाऱ्या पुरुषाची ‘बायकोबाई’ म्हणून संभावना होते. शाकाहारी समाजाच्या वस्तीत मांसाहारी व्यक्तीस राहायला घर मिळत नाही. गणेशचतुर्थीच्या दिवशी घरात अंडाकरी बनवली, तर घरातले सगळे नाराज होतात. आणि २ ऑक्टोबरला भारतात कुठेही (अधिकृतरीत्या) मद्यविक्री करता येत नाही.

कुठल्याही समाजामध्ये, त्यात रुजलेल्या संस्कृतीमुळे मिळणारी मुभा आणि संस्कृतीमुळेच होणारे विरोध, त्या संस्कृतीची पाठराखण करणारे आणि रुजलेल्या संस्कृतीस आव्हान देणारे यांमध्ये सततची रस्सीखेच असते. या रस्सीखेचेमधून व्यक्तिगत सुखदु:ख उगम पावतात, नव्या कलाकृती निर्माण होतात, नवे साहित्य लिहिले जाते, नवी राजकीय व्यवस्था उदयास येते, त्याच वेळी त्यास विरोध करणारेही व्यक्त होऊ लागतात, नवे कायदे केले जातात, त्यांना आव्हान देणारेही तयार होतात. समाजामध्ये अशी सांस्कृतिक घुसळण अव्याहत सुरू असते. आपण जेव्हा सदर प्रकल्पासाठी सर्वांत प्रथम एक दिशादर्शक सत्र घेतले, त्यात स्त्री चळवळीने स्त्री संबंधित प्रचलित समज, रूढी, कायदेकानून यांना कसे आव्हान दिले, नव्या जाणिवा रुजवण्याचा कसा
प्रयत्न केला, आणि त्या प्रयत्नांच्या विरोधात कसा backlash आला याची थोडक्यात चर्चा केलीच आहे. ज्या अभ्यासकांनी ‘सांस्कृतिक क्षेत्रा’मधील एखाद्या मुद्द्याची निवड केली आहे, त्यांना वर उद्धृत केलेल्या घटितांची जाणीव ठेवावी लागेल.

गमतीचा भाग हा आहे की, संस्कृतीमान्य प्रचलित वर्तणुकीपेक्षा निराळ्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला तो समाज कसा वागवतो, हासुद्धा त्या समाजाच्या संस्कृतीचाच भाग असतो. काहीही नवे, निराळे समोर ठाकले तर त्याचे स्वागत होईल, त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न होईल, त्याला सक्रिय परंतु कायद्याच्या चौकटीत राहून विरोध होईल की त्याविरुद्ध हिंसक प्रतिक्रिया येतील, हे त्या त्या समाजाच्या मानसिकतेनुसार ठरते. पण ही मानसिकता आपोआप घडत नाही. त्या समाजावर सत्ता गाजवणारी राजकीय यंत्रणा कशी वागते, त्या समाजातील साहित्य, चित्रपट आणि रंगभूमी कोणती मूल्ये समाजात लोकप्रिय करतात, त्या समाजातील विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती, उदाहरणार्थ, खेळाडू, गायक, लेखक, अभिनेते यांची समाजातील वर्तणूक कशी असते आणि समाज त्यांचे अनुकरण करतो का, या व अशा अनेक घटकांवर त्या समाजाची समष्टीच्या पातळीवरील मानसिकता ठरत असते. उदाहरणार्थ, पाश्चात्य शिक्षण, स्वातंत्र्यप्राप्ती, राष्ट्राने स्वीकारलेली लोकशाही राज्यव्यवस्था, शासकीय योजना आणि स्वतंत्र भारताचे कायदे, जोडीला अनेक धुरीणांनी जातिनिर्मूलनासाठी केलेले प्रयत्न, त्या त्या समाजात आदरणीय मानली गेलेली संतवचने यांच्या संयुक्त परिणामे आपला समाज जातिव्यवस्था, लैंगिकता यांबाबतीत थोडातरी संवेदनशील आणि उदार होऊ लागला आहे. समलिंगी आकर्षण वाटणारी व्यक्ती आता गुन्हेगार किंवा वेडी समजली जात नाही. जात ही ‘तोरणाला आणि मरणाला’ अजूनही महत्त्वाची ठरत असली, तरी इतर सामाजिक व्यवहारांमध्ये ती अधिकाधिक गैरलागू ठरू लागली आहे. या दोन्ही बाबतीत आपली संस्कृती किंचित का होईना उदार होऊ लागली आहे. या उलट धर्माच्या बाबतीत ती अनुदार होऊ लागली आहे. त्याला मुख्यत्वे नव्याने रुजलेली राजकीय यंत्रणा कारणीभूत आहे. हा फार महत्त्वाचा सांस्कृतिक बदल आहे व तो नाकारून चालणार नाही. अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वी बहुसंख्याकांच्या उत्सवात अल्पसंख्य अगदी विनासंकोच सामील होत असत, आता मात्र ते त्यांपासून लांब राहू लागले आहेत. त्याचवेळी त्यांना लांब ठेवावे, असे बहुसंख्यांमधील किमान काही समूह तरी म्हणू लागले आहेत. या सांस्कृतिक बदलाची दखल घ्यावी लागेल. कारण त्यामागेही राजकारण आहे, आणि पुढेही या बदलाचे राजकीय पडसाद पडणार आहेत.

आता वरील सर्व चर्चेचा आपण हाती घेतलेल्या अभ्यास प्रकल्पाशी संबंध लावायचा, तर महाराष्ट्राचा स्वभाव स्त्री चळवळीच्या प्रभावामुळे किती बदलला याचा वेध घ्यावा लागेल. लेखाच्या अगदी सुरुवातीस नमूद केलेले जे सांस्कृतिक घटक आहेत, त्यांवर स्त्री चळवळीने काही प्रभाव टाकला का? टाकला असल्यास कोणता? हे तपासावे लागेल. पुनश्च एकदा लैंगिकतेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास स्त्री-चळवळ सातत्याने म्हणत आली आहे की, लिंगभेद हा जीवशास्त्रीय कमी, आणि सांस्कृतिक जास्त आहे. म्हणूनच व्यक्ती पुरुष आहे, स्त्री आहे की तृतीय पंथी याला फारसे महत्त्व न देता, तिला माणूस म्हणून समान प्रतिष्ठा आणि अधिकार मिळाले पाहिजेत. स्त्री चळवळीच्या या धोरणामुळे समाजातील सर्वच अल्पसंख्याकांना स्वत:च्या मागण्या समाजापुढे मांडण्यासाठी बळ मिळाले. व त्यातूनच व्यक्तीचा लैंगिक कल हा नैसर्गिक तर असतोच, पण तो अनुषंगिक मानला पाहिजे, हा विचार थोडा का होईना रुजू लागला. हा निश्चितपणे स्त्री चळवळीचा प्रभाव असून त्याच्या आधारे आज आपण ‘तृतीयपंथीयांसाठी कामाच्या जागी राखीव जागा’ या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो आहोत.

स्त्री चळवळीने जगभरच्या स्त्रियांना एका कवेत घेणारी ‘भगिनीभाव’ ही संकल्पना मांडली. स्त्री चळवळीमुळे भिन्न जातींमधील, भिन्न स्तरांमधील स्त्रिया एकत्र येण्याचे प्रसंग वाढले आणि त्यायोगे स्त्रियांमध्ये आपसात वावरताना जातभावनेची प्रखरता कमी झाली. याचा अर्थ त्यांच्या मनातील जातभावना पूर्णपणे गेली असे नाही. कौटुंबिक पर्यावरणात ती डोकं वर काढतेच. परंतु जेथे फक्त स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा जात हा घटक फार डोके वर काढत नाही,कारण ‘स्त्री’ म्हणून त्यांच्यामध्ये सहअनुभूतीची अधिक प्रखर अशी भावना जागृत होते.

संस्कृती प्रवाही असते; नव्हे ती प्रवाही असावीच लागते. तरच ती व्यक्ती-व्यक्तीला स्वत:च्या नैसर्गिक प्रेरणा अनुसरण्याची मुभा देते. अशी मुभा असण्याचा संबंध समन्यायाशी असतो. कालौघात सर्व संस्कृतींचे हळूहळू का होईना, पण लोकशाहीकरण होत आहे आणि ‘समन्याय’ हा लोकशाहीचा कणा आहे. म्हणूनच आपल्या अभ्यास प्रकल्पात ‘सांस्कृतिक’ विभागात काम करणाऱ्या अभ्यासकांना हे लक्षात घ्यावे लागेल की गेल्या पन्नास वर्षांत स्त्री चळवळीच्या प्रभावाखाली जे सांस्कृतिक बदल झाले त्यांच्या मुळाशी ‘समन्याय’ ही मागणी आहे किंवा कसे.

आधी म्हटल्याप्रमाणे संस्कृती ही व्यक्तींच्या मानसिकतेचे सामूहिक प्रकटीकरण असते. यात व्यक्तीची मानसिकता महत्त्वाची असतेच, पण त्या मानसिकतेचे संख्याबळही निर्णायक असते. जेव्हा निराळ्या मानसिकतेच्या व्यक्तींची संख्या निर्णायक संख्येने वाढते, (त्याला शास्त्रीय परिभाषेत ‘क्रिटिकल मास’ असे
म्हणतात.) तेव्हा या व्यक्तींच्या वागण्यातील बदल व्यक्तिगत न राहता सामाजिक पातळीवर दिसू लागतात. यालाच आपण सांस्कृतिक बदल म्हणतो. स्त्री चळवळीचा सांस्कृतिक अंगांवर काय प्रभाव पडला हे अभ्यासताना चळवळीने स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेत का आणि कशाप्रकारे बदल घडवून आणले, त्यांचे
प्रमाण काय आहे, यांचा वेध घ्यावा लागेल. आपल्या दिशादर्शक सत्रामध्ये आपण म्हटले आहे की, बदलत्या मानसिकतेच्या मुळाशी बदलत्या जाणिवा असतात. त्यामुळे त्यांचा सांस्कृतिक अंगाने शोध घ्यावा लागेल.

कुठलीही चळवळ निर्वात पोकळीत आकार घेत नाही. तिच्या बरोबरीने आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक, तांत्रिक बदल घडून येत असतात. ते एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. म्हणून तर हे जग परस्पर परिणामकारी आहे, असे सोव्हिएत युनिअनचे भूतपूर्व अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह म्हणाले होते. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्र प्रगत झाले, त्याला संततिनियमनाची साधने विकसित करता आली, म्हणून स्त्रियांचा स्वत:च्या पुनरुत्पादन क्षमतेवर काही अंशी ताबा आला, आणि स्त्री थोडी का होईना सुटवंग झाली. हा तिचा सुटवंगपणा सत्कारणी लावण्याचे मार्ग स्त्री-चळवळीला औद्योगिकीकरणात सापडले. दोन जागतिक महायुद्धांमुळे स्त्रियांनी घराबाहेर पडून अर्थार्जनासाठी काम करण्याची गरजच निर्माण झाली म्हणून स्त्रियांच्या सवेतन कामाकडे बघण्याची पुरुषांची आणि एकूणच समाजाची दृष्टी बदलली, इत्यादी. स्त्रिया घराबाहेर पडू लागल्याबरोबर कुटुंबांकुटुंबाच्या खाद्य संस्कृतीत बदल घडू लागले. आज समाजाची खाद्य संस्कृती कमालीची बदलली आहे. त्यात औद्योगिकीकरणाचा खूप मोठा वाटा आहे, हे जरी खरे असले, तरी स्त्री चळवळीचासुद्धा मोठा वाटा आहे. कधी तो थेट दिसून येतो, तर कधी तो अप्रत्यक्षपणे काम करत असतो. ज्या अभ्यासकांनी ‘सांस्कृतिक’ या विभागांतर्गत ‘खाद्यसंस्कृती’ हा मुद्दा निवडला असेल, त्यांना स्त्री चळवळीच्या प्रभावाखाली येऊन या राज्यातील अन्नविषयक सवयी, रुची कशी बदलली, स्त्रियांची जीवनपद्धती बदलल्याने अन्नविषयक धारणा किंवा व्यवसाय बदलले का, यांचा मागोवा घ्यावा लागेल. एवढेच काय, स्त्री चळवळीच्या प्रभावाखाली येऊन खाद्य संस्कृती, पारंपरिक पदार्थ यांचे काही अभ्यास सुरू झाले का, हेसुद्धा बघावे लागेल.

सरतेशेवटी, स्त्री चळवळीच्या प्रभावाखाली येऊन जे बदल घडून येताना दिसत आहेत, त्याविरुद्ध काय प्रतिक्रिया येत आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी चळवळीने काही मार्ग निवडले आहेत का, चळवळीचा परिणाम म्हणून काही नकारात्मक प्रवृत्ती डोके वर काढत आहेत का, (या प्रवृत्ती वैयक्तिक किंवा सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर असू शकतील), असे तण दूर करण्यासाठी स्त्रीचळवळ काय उपाययोजना करत आहे, यावरसुद्धा चिंतन होणे अपेक्षित आहे.

प्रकल्पामधील ‘सांस्कृतिक क्षेत्र’ या विभागासाठी वरील चर्चा उपयुक्त ठरावी म्हणून सदर लेखाचा प्रपंच मांडला आहे. त्यावर आपले विचार आणि प्रतिक्रिया मिळाल्यास आनंदच होईल.

करुणा गोखले, पुणे

karunagokhale@gmail.com