स्त्री चळवळीचा परिणाम लेखांक १

करुणा गोखले संस्कृतीकारण
१३ जून २०२५

एखाद्या जनसमुहाची जीवनपद्धती म्हणजे त्याची संस्कृती अशी संस्कृतीची अगदी साधीसोपी व्याख्या करता येते. जीवनपद्धतीमध्ये त्या समुहाचे सामाजिक रीतीरिवाज, धार्मिक रूढी-परंपरा, सण, समारंभ आणि उत्सव, साहित्य, कला, वेशभूषा इत्यादी तर येतेच, शिवाय त्या जनसमूहाची खाद्यसंस्कृती आणि पाकसंस्कृती यापण महत्त्वाच्या अंगांचा समावेश होतो. सदर लेख हा ‘स्त्री चळवळी-सांस्कृतिक क्षेत्रातील बदल’ या व्यापक विभागातील ‘खाद्यसंस्कृतीतील’ बदलांचा आढावा घेणार आहे. या विषयावरील हा पहिलाच लेख असल्याने त्याचे स्वरूप ‘विषय प्रवेश’ असे असेल.

विषय प्रवेशाच्या आधी काही बाबी नमूद करणे अगत्याचे वाटते. एक म्हणजे लेखनाचा रोख स्त्री चळवळीच्या परिणामी खाद्यसंस्कृतीत काय बदल झाल्याचे दिसून येते हा असावा. येथे पाककृती किंवा खाद्यपदार्थांची यादी देणे अभिप्रेत नाही. दुसरे म्हणजे आपल्या जातिबध्द समाजात खाद्यसंस्कृतीसुध्दा मोठ्या प्रमाणावर जातसापेक्ष राहिली आहे. त्यामुळे सामाजिक वास्तव म्हणून जातींचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे. परंतु त्यामागे कुठल्याही जातीचे गौरवीकरण किंवा क्षुल्लकीकरण हा हेतू नाही असे आपण गृहीत धरू या. ज्या अभ्यासकास जे खाद्यपदार्थ अधिक परिचयाचे, त्याची उदाहरणे त्याच्या किंवा तिच्या लेखनात उतरणे स्वाभाविक आहे. परंतु अशी उदाहरणे देण्यामागे इतर जातसमूहांच्या खाद्यसंस्कृतीस बेदखल करण्याचा ‘डाव’ आहे, असे कृपया कुणी समजू नये. तिसरा दखलपात्र मुद्दा हा की, प्रत्येक जनसमूहास रुचकर आणि पौष्टिक कसे खावे, हे कळते, असे समाजशास्त्रीय निरीक्षण आहे. त्यामुळे स्वसंस्कृतीविषयी अभिमान आणि दुसऱ्याच्या खाद्यसंस्कृतीविषयी हीनत्वाची भावना गैरलागू ठरते. चौथी लक्षात घेण्याची बाब म्हणजे खाद्यसंस्कृतीमध्ये(सुध्दा) व्यक्ती आणि समष्टीवरील भेद लक्षात घ्यावे लागतात. समाजाची खाद्यसंस्कृती कितीही वैविध्यपूर्ण आणि समृध्द असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवताना व्यक्तीवर तिच्या आर्थिक क्षमतांच्या, वैयक्तिक कौशल्यांच्या आणि इतर तत्कालिक परिस्थितीजन्य मर्यादा पडत असतात.

कुठल्याही जनसमूहाची खाद्यसंस्कृती मुख्यत्वे तीन-चार घटकांवर अवलंबून असते :

१ स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्ये : प्रदेशाचे हवामान व तेथे मुबलक उपजणारे धान्य/भाजीपाला, नैसर्गिकरीत्या उपलब्ध जैविक खाद्य, (उदा: किनारपट्टीवर मासळी), वन्य प्रदेशांत उपलब्ध पक्षी व इतर खाद्य वन्यजीव वगैरे. ज्या त्या हवामानात जे पिकते, पचते, ते खाद्यसंस्कृतीत मध्यवर्ती स्थान मिळवते. कोकण भागात उन्हाळ्यात घरोघरी कोकमाचे सरबत होते, तर विदर्भात अंबाडीचे सरबत मिळते. सोलापूर भागात ज्वारीचे प्रस्थ, तर कोकणात तांदळाचे पदार्थ मुबलक.

२ धर्म, जातिबद्ध सामाजिक बांधणी आणि खाद्य-वैशिष्ट्ये : सुप्रसिध्द लेखिका आणि विदुषी दुर्गा भागवत म्हणत की त्या अन्यथा जात पाळत नसल्या, तरी खाण्याच्या बाबतींत पाळतात. यामागचे कारण असे की, भारतासारख्या जातिबद्ध समाजात जात त्या त्या समूहाच्या खाद्यसंस्कृतीस आकार देत असते. अनेक जातिसमूहांचे स्वत:चे काही खास पदार्थ असतात, ते त्या त्या जातींचे मानदंड असतात, उदा: सी.के.पी. समाजाचे कानवले, मालवणी समाजाचे कोंबडीवडे, लेवा पाटील समाजात लोकप्रिय असणारी कळण्याची भाकरी, इत्यादी. अशा जातिविशिष्ट पदार्थांमुळे आपल्या समाजाची खाद्यसंस्कृती कमालीची वैविध्यपूर्ण आणि समृध्द झाली आहे. खाण्यामधील जातव्यवस्थेची एक जमेची बाजू म्हणजे त्यात जात पाळणे किंवा जातीबाहेर जाणे यावर निर्बंध नाहीत. उदा: महाराष्ट्रात गौरीच्या प्रसादाला कोकणस्थ ब्राह्मण समाजात घावन-घाटले बनते, या उलट इतर बहुसंख्य जातींमध्ये पुरणपोळी बनवली जाते. पण म्हणून एखाद्या घरात बरोब्बर उलटे केले यासाठी कुणी कुणाला बहिष्कृत केल्याचे ऐकिवात नाही. किंवा मुस्लीमधर्मीय ईद साजरी करताना शेवयांची खीर बनवतात म्हणून हिंदूंनी किंवा बौद्धधर्मीयांनी खीर खाणे सोडले असे (अजून तरी) ऐकिवात नाही.

३ विशेष प्रसंगी घरोघरी हटकून बनवण्याचे पदार्थ : प्रत्येक समाजांत विशिष्ट प्रसंगांना काही ठराविक पदार्थ हटकून बनवले जातात. उदा: पाश्चात्य देशांत ख्रिसमसच्या वेळी बनवली जाणारी टर्की, महाराष्ट्रात होळीला बनवली जाणारी पुरणपोळी, तर उत्तर भारतात बनवल्या जाणाऱ्या खव्याच्या गुज्जिया म्हणजेच करंज्या, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद म्हणून दिला जाणारा शिरा. महाराष्ट्रात सोलापूरकडील धनगर समाजात लग्नाची वरात येते तेव्हा वधू आणि वर असे दोन्ही पक्ष एकमेकांना सांजोऱ्या देतात. (पण इतर भागांतील धनगर समाजात हीच रूढी पाळली जाते असे नाही.) महाराष्ट्रात काही समाजात नवरदेव लग्नासाठी निघाला की त्याला दूध-सुतरफेणी खायला देतात. मुद्दा हा की प्रत्येक समाजात रीती-रिवाजांशी निगडीत खाद्यपदार्थ असतात. त्यांची सांगड मोडली की काहीतरी चुकल्यासारखे वाटते. द्यायला आणि खायला सुटसुटीत पडतो असं म्हणत सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून कुणी बुंदीचा लाडू दिला, आणि ईदेच्या दिवशी एखाद्या मुस्लीम कुटुंबाने मित्रमंडळीत चीज केक वाटला, तर त्याची चार लोकांत चर्चा होईलच. समाजाची खाद्यसंस्कृती त्याच्या भाषेतून, म्हणी, वाक्प्रचारांमधून हमखास व्यक्त होते. उदा: शादीके लड्डू जो खाये वो भी पछताये, ना खाये वो भी पछताये; किंवा कुणाच्या तरी बारश्याच्या घुगऱ्या खाल्लेल्या असणे, इत्यादी.

४ आर्थिक ताकद आणि धार्मिकता : प्रत्येक कुटुंबाची खाद्यसंस्कृती ही अपरिहार्यपणे त्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर आणि धार्मिक धारणांवर अवलंबून असते. कुटुंब किती कडवे शाकाहारी किंवा मांसाहारी यावर त्या कुटुंबाच्या खाद्यपरंपरा ठरत असतात आणि आर्थिक कुवतीनुसार घरात किती प्रमाणात दूध-दुभते, भाजीपाला, अंडी व अन्य मांस-मच्छी येणार हे ठरते. आर्थिक आणि धार्मिक हे दोन्ही घटक कालमानानुसार बदलू शकतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली वा खालावली किंवा कुटुंबात नवी व्यक्ती येऊन दाखल झाली, व तिला सामावून घेण्यासाठी कुटुंबाने लवचीक धोरण स्वीकारले तर कुटुंबाची खाद्यसंस्कृती बदलते, पण हळू हळू.

आर्थिक क्षमतेचा मुद्दा दुर्दैवाने जातवास्तवाशीसुध्दा निगडीत असतो. वर्णव्यवस्थेच्या उतरंडीत सर्वांत खाली असणारे समाज संधींच्या अभावी आणि अन्याय्य व्यवस्थेमुळे अभावग्रस्तही राहतात. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या खाद्यसंस्कृतीवर पडत असतो. मात्र एक बाब आवर्जून लक्षात घ्यायला हवी, की अभावग्रस्ततेमुळे खाद्यसंस्कृतीवर मर्यादा येत असल्या, तरी त्याचा पाककौशल्याशी संबंध नसतो. पाककौशल्य हे वर्ग/जातसापेक्ष नसते. (हे खरे तर प्रत्येकच कौशल्यास लागू पडते. परंतु कौशल्य विकसित करण्यास आणि व्यक्त करण्यास संधी मिळणार की नाही, हे मात्र वर्ग/जात यांवर अवलंबून असते. सुदैवाने आता याही परिस्थितीत बदल होत आहेत.)

५ जागतिक परीस्थितीतले बदल : जनसमूहांचीपण खाद्यसंस्कृती परिस्थितीवशात बदलत असतेच. त्यावर संपूर्ण समाजाचा आर्थिक स्तर वर-खाली होणे, वाहतूक साधनांच्या उपलब्धीमुळे धान्य, भाजीपाला, फळफळावळ, दुग्धजन्य पदार्थ, मांस-मच्छी देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणे, शेतकऱ्याने नवी कृषिउत्पादने घेणे, जागतिकीकरणाच्या परिणामी आशियाई देशांमध्ये मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढणे, विविध प्रांतांमधील/देशांमधील लोकांमध्ये अभिसरण वाढणे व त्यामुळे एकमेकांच्या खाद्यसंस्कृतीचा परिचय होणे, या व अशा अनेक परिस्थितीजन्य घटकांमुळे खाद्यसंस्कृती बदलते. भारतामध्ये देशांतर्गत अभिसरण वाढल्यामुळे सत्तर-ऐंशीच्या दशकातच प्रादेशिक खाद्यसंस्कृती स्वागतशील व्हायला सुरुवात झाली होती. विशेषत: महाराष्ट्र हे उद्योगांत अग्रेसर राज्य असल्यामुळे सत्तरच्या दशकांत अगदी तालुक्याच्या गावांमध्येसुध्दा दाक्षिणात्य पदार्थ निदान उपहारगृहांमध्ये तरी सर्रास उपलब्ध होऊ लागले होते. ऐंशीच्या दशकात मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गांकडे मिक्सर हे उपकरण आल्यावर इडली-डोसे हे दाक्षिणात्य पदार्थ महाराष्ट्राच्या घरोघरी खाद्यसंस्कृतीचाच नव्हे, तर पाकसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाले. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणामुळे देशातील प्रगत राज्यांमध्ये मध्यमवर्गाचा आर्थिक स्तर एकदम उंचावला. त्याच्या जोडीला या वर्गात परदेशगमन वाढले, खुल्या बाजारपेठेमुळे चीज, मार्जरीन, ऑलिव्ह ऑइल, मशरूम, वेगवेगळ्या देशांमधील मसाले इत्यादी उपलब्ध होऊ लागले आणि मध्यम, उच्चमध्यम आणि श्रीमंत वर्गाच्या खाद्यसंस्कृतीत ते सामील झाले. मात्र मूळ भारतीय खाद्यसंस्कृती प्रत्येकच प्रदेशात इतकी तगडी आहे, की ती लोप पावली नाही, आणि पावणारही नाही.

६ पर्यटन आणि औद्योगिकीकरणामुळे मिळालेली खाद्य-ओळख : महाराष्ट्र औद्योगिकीकरणात अग्रेसर असल्यामुळे येथे रोजगाराच्या शोधात देशभरातून माणसांचे लोंढे येतात. त्यात कष्टकरी, असंघटित कामगार मोठ्या संख्येने असतो. आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील या वर्गाची भूक भागवण्यासाठी प्रत्येकच महानगरी काही पदार्थ प्रचलित करते. कालांतराने हे पदार्थही त्या प्रदेशाची ओळख बनते. वडापाव आणि पावभाजी हे दोन तुलनेने स्वस्त आणि पोटभरीचे पदार्थ ही भारताला मुंबईची देण आहे आणि आता हे पदार्थ म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनले आहेत. मुंबईच्या चौपाटीवर सर्व स्तरांतल्या पर्यटकांना मोहित करणारी भेळ हीसुद्धा कमी पैशात पोट आणि मन तृप्त करणारी चैन आहे. आणि तीसुध्दा महाराष्ट्राची खाद्य ओळख आहे. कितीही सामाजिक स्थित्यंतरे झाली, तरी ती विसरली जाणार नाही, असे आत्ता तरी वाटते.  

हा झाला आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा परिचयात्मक आढावा. आतापर्यंत आपण त्यावर स्त्री चळवळीचा कसा आणि काय परिणाम दिसून येतो याविषयी काही बोललो नाही. शिवाय खाद्यसंस्कृतीचा विचार करताना आपण मुख्यत्वे मध्यम आणि त्यावरील वर्गांचा विचार केला. पण कष्टकरी, असंघटित समूहांच्या खाद्यसंस्कृतीवर जागतिकीकरणाचे काही उफराटे परिणाम झालेले दिसून येतात ते बेदखल करून चालणार नाहीत.

७ जागतिकीकरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग आणि त्यांची खाद्यसंस्कृती : जागतिकीकरणाच्या रेट्यात मुख्य प्रवाहाबाहेरील अनेक जनसमूहांचे उत्पन्न खालावले. शहरीकरणाच्या रेट्यात पोषणासाठी वन्यसंपदेवर अवलंबून असणाऱ्या जनसमुहांचे अन्नस्रोत आक्रसले. कुपोषण ही समस्या बळावली. नगदी पिके घेण्याकडे कल वाढला, तसा छोट्या शेतकऱ्याच्या परसातील भाज्या, कडधान्ये यांची लागवड लुप्त होऊन कुटुंबाच्या आहाराचा दर्जा खालावला. जागतिकीकरणाने बाजारपेठ विस्तारल्यावर आणि दळणवळणाची साधने वाढल्यावर तर त्याचे चित्र-विचित्र परिणाम खाद्यसंस्कृतीवर दिसू लागले. गावोगावी, स्थानिक पातळीवर बेकरी उत्पादने तयार होऊ लागली. मोठ्या उद्योगांकडून तयार होणारे व मुख्यत्वे कमी पोषणमूल्य असणारे वेष्टनांतील चटपटीत पदार्थ जाहिरातींच्या माऱ्यामुळे अगदी खेडोपाडी आणि सहजी उपलब्ध होऊ लागले. परिणामी, जी कष्टकरी आणि निम्न आर्थिक स्तरातील स्त्री सकाळी लवकर उठून ताज्या भाकऱ्या भाजून, किंवा भाताचं आटवल बनवून घराबाहेर पडत होती, ती आता स्वत:सकट घरादाराला चहा-खारी, चहा-पाव चारून घराबाहेर पडू लागली. अशाने कुटुंबाच्या पोषणाची प्रत आणखी खालावली. या वास्तवाला भिडणारी पहिली सामाजिक चळवळ होती स्त्री चळवळ.

स्त्री चळवळ आणि आहारविषयक जागृती : सत्तरच्या दशकात मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या, प्रागतिक विचारांच्या महिलांसाठीच्या मासिकांनी स्त्री आरोग्य व त्या अनुषंगाने स्त्रियांचा आहार यांवर तज्ज्ञांकडून लेखन करून घेण्यास सुरुवात केली. यात पायाभूत संशोधन कमला सोहोनी यांनी केले असले, तरी त्याचे सार सर्वसामान्य, शिक्षित गृहिणीपर्यंत पोचवण्याचे मोलाचे काम मालती कारवारकर, विजया साठे व अन्य वैद्यकांनी केले. स्त्रीचे आणि तिच्या कुटुंबाचे आरोग्य आणि त्याचा आहाराशी असणारा थेट संबंध अधोरेखित करण्याचे जे काम सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मोठ्या प्रमाणात झाले त्याची मुळे निश्चितपणे स्त्री चळवळीत आणि त्यातून साधू लागलेल्या स्त्रीच्या आरोग्यभानाशी निगडीत आहेत. सुरुवातीस त्याचे फायदे मुख्यत्वे शहरी, शिक्षित वर्गातील स्त्रियांना मिळत असले, तरी नव्वदच्या दशकामध्ये ते शहरी गरीब आणि ग्रामीण स्त्रीपर्यंतसुध्दा थोड्या प्रमाणात का होईना, पोचू लागले,

स्त्री शिक्षण, तिचे अर्थार्जन आणि कुटुंबाची खाद्यसंस्कृती : स्त्री चळवळीचे आणखी एक थेट फलित म्हणजे स्त्री शिक्षणाच्या प्रसारापाठोपाठ स्त्रिया मोठ्या संख्येने अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या. याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर झालेला दिसून येतो. शहरांमध्ये स्थलांतर, विभक्त कुटुंबे आणि स्वत:ची नोकरी या कारणांमुळे स्त्रीची वेळेबरोबर लढाई सुरु झाली. पूर्वीसारखा सकाळ-संध्याकाळ चारी ठाव स्वयंपाक करणे अनेकींना जमेनासे झाले आणि त्यांच्या रोजच्या जेवणातील पदार्थसंख्या कमी होऊ लागली. स्त्री अल्पशिक्षित असेल, तर या बदलाचा थेट दुष्परिणाम ती आणि तिच्या कुटुंबावर दिसू लागला. स्त्री अधिकाधिक वेळवाचवू बेकरी उत्पादनांवर विसंबू लागली. मात्र याचबरोबर तिच्या हातात स्वकष्टाचा पैसा खेळू लागल्यामुळे ती अधूनमधून का होईना मुलाबाळांसाठी हक्काने फळे, मिठाई इत्यादी वस्तू विकत घेऊ लागली. याउलट शिक्षित आणि जागरूक स्त्री विचारपूर्वक कमी वेळात, कमी श्रमात समतोल आहार कसा घ्यायचा याचे नियोजन करू लागली. साहजिकच रोजच्या जेवणात मोड आलेली कडधान्ये, अंडी, शेंगदाणे, गूळ, सोयाबीन, नाचणी, जवस, पालेभाज्या, राजगिरा, खजूर, आर्थिक क्षमतेनुसार फळे, चीज, दूध-दही यांचा कमी-जास्त प्रमाणात वापर होऊ लागला. या बाबतीत तिला स्त्री चळवळीत सहभागी आहार तज्ज्ञांचे चांगले मार्गदर्शन मिळू लागले.

स्त्री चळवळीने जाणीवपूर्वक कष्टकरी स्त्रीच्या पोषणस्थितीचे अभ्यास हाती घेतले व त्यामुळे समाजाची आणि धोरणकर्त्यांची ग्रामीण, गरीब स्त्रीच्या कुपोषण समस्येची जाण वाढली. आज कुटुंब शहरी असो, वा ग्रामीण; शाकाहारी असो, वा मांसाहारी, ते शिक्षित असेल, तर वर उल्लेखलेल्या अन्नपदार्थांचा समावेश त्याच्या रोजच्या आहारात असतोच असतो. आरोग्याला घातक अशा रिफाइंड तेलांचा, हायड्रोजनेटेड वनस्पती तुपाचा, बेकरी उत्पादनांचा वापर नक्की कमी झाला आहे. या उलट स्त्री अल्पशिक्षित असेल किंवा पुरेशी जागरूक नसेल, तर एकीकडे परंपरेने आलेले साधे, घरगुती, स्वस्त पण पोषक पदार्थ ती करायला विसरली आहे किंवा ते करायला तिला पुरेसा वेळ नाही आणि दुसरीकडे आर्थिक व वेळेच्या मर्यादांमुळे पाव-बिस्किटे-खारी-टोस्ट, वडा-पाव आणि बाजारातले तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्याकडे कुटुंबाचा कल वाढला आहे.

नोकरदार स्त्रीकडील वेळेच्या अभावाने पोषणदृष्ट्या निरुपयोगी खाद्यपदार्थांना बाजारपेठ तयार झाली. त्याच वेळी शहरांमध्ये रोजच्या जेवणातले भाजी-भाकरी-चपाती-खिचडी असेही पदार्थ आवर्जून उपलब्ध होऊ लागले. पोळी-भाजी केंद्र हा नवा व्यवसाय भरभराटीला आला. एका परीने हे नोकरदार स्त्रिया, घरापासून दूर राहणारे स्त्री-पुरुष यांच्यासाठी वरदान ठरले. मात्र त्याच वेळी स्वयंपाक हे जीवनावश्यक कौशल्य आहे याचे भान सुटून एकाचे उदरभरण हा दुसऱ्यासाठी धंदा झाला. त्यात ग्राहकाकडे कमीतकमी अधिकार राहिल्याने आजमितीस अनेकजण आर्थिक शोषण आणि कमअस्सल पोषण या कात्रीत सापडलेले दिसतात. शहरी भागात त्यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी झुणका-भाकर केंद्रे निघाली पण नंतर ती थंडावली. समाजाचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पुनश्च एकदा अशी केंद्रे सर्वत्र सुरु होणे गरजेचे आहे. त्याच वेळी स्त्री चळवळ म्हणते त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वयंपाकाचे कौशल्य शिकणे आवश्यक झाले आहे. 

बदललेली पाकसंस्कृती : स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याच्या परिणामी खाद्यसंस्कृती जेवढ्या प्रमाणात बदलली त्याहीपेक्षा जास्त पाकसंस्कृती बदलली असे म्हणायला हवे. कारण नोकरदार स्त्रीला पारंपरिक पदार्थ करण्यास उसंत मिळेनाशी झाली. ते पदार्थ आहारात राहिले, पण घरी करणे बंद झाले. आज वर्षाचे साठवणीचे, वाळवणाचे पदार्थ हे मुख्यत्वे स्त्रियांच्या बचतगटांनी करावयाचे पदार्थ समजले जातात. पूर्वी हे पदार्थ बनवण्याच्या निमित्ताने स्त्रियांची शेजार-पाजारच्या स्त्रियांबरोबर सामूहिक जीवनाची वीण विणली जायची, ती उसवली आहे. साठवणीचे पदार्थ बनवणे हा एक कौटुंबिक सोहळा असे. तो आता थांबला. मात्र त्याचबरोबर या पदार्थांनी अनेक वंचित, ग्रामीण स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. त्याने गृहउद्योगांचे रूप घेतल्याने हजारोंच्या संख्येने स्त्रिया सूक्ष्म उद्योगांच्या अर्थकारणात सहयोगिनी होऊ शकल्या. 

जी गोष्ट साठवणीच्या पदार्थांची, तीच विशेष पक्वान्ने, फराळाचे पदार्थ यांची. पुरणपोळ्या, गुळपोळ्या, खव्याच्या पोळ्या, उकडीचे मोदक, गुलाबजाम, श्रीखंड यांसारखी पक्वान्ने, चकल्या, भोपळघारगे यांसारखे पदार्थ आणि बिर्याणी सर्रास बाजारात मिळू लागले. पुनश्च त्याने स्त्रियांना रोजगाराची संधी मिळवून दिली, गृहिणीची सोय झाली. परंतु हे पदार्थ विनामेहनत मिळू लागल्यामुळे सुखवस्तू स्तरांत त्यांचे सेवन प्रमाणाबाहेर वाढल्याने अनारोग्याचे निराळेच प्रश्न निर्माण झालेले दिसतात. त्यांकडे आता सामाजिक अंगाने बघणे गरजेचे झाले आहे.

स्त्री चळवळीने प्रथमपासून स्त्रियांसाठी रोजगारनिर्मितीची मागणी केलेली आहे. बदलते कालमान आणि वर्षानुवर्षांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यांची सांगड घालताना स्त्रियांसाठी खाद्यपदार्थांची निर्मिती ही आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरली. परंतु त्याच वेळी सधन वर्गासाठी त्यातील वेळ आणि श्रमाची गुंतवणूक आणि कौशल्याची गरज संपुष्टात आली व त्याचे पर्यवसान सधन वर्गात राहणीमानाशी निगडीत नवे आजार बळावण्यात झाले. आज शाळा-कॉलेजेसच्या बाहेरील वडा-पाव, चायनीज पदार्थ विकणाऱ्यांची भाऊगर्दी किशोरवयीन पिढीच्या खाद्यसंस्कृतीस आकार देत आहे. त्याचे थेट प्रतिबिंब वैयक्तिक पातळीवरील खाद्यसंस्कृतीवर पडू लागलेले दिसतायत. एखाद्या समारंभासाठी जमलेल्या पाहुण्यांची वये, शारीरिक अवस्था इत्यादी विचारात न घेता बाजारात उपलब्ध तेलकट, मसालेदार किंवा अजिनोमोटोसारखे घातक अन्नघटक घातलेल्या पदार्थांनी पाहुणचार करणे सुरु झालेले आहे. पाहुणचार हे स्त्रीवरील ओझे होऊ नये हा विचार योग्यच आहे. परंतु नव्याने अंगीकारलेल्या खाद्यसंस्कृतीत पाहुण्यांचे आणि उत्सवमूर्तीचे आरोग्य बेदखलपण होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी. स्त्री चळवळीने सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत स्त्रीचे आरोग्य आणि आहार हे मुद्दे ऐरणीवर आणले, आज पुनश्च याच मुद्द्यांचा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्त्री चळवळीचा पाकसंस्कृतीवर झालेला आणखी एक परिणाम म्हणजे चळवळीच्या सुरुवातीच्या १५-२० वर्षांत स्वयंपाक करणे म्हणजे स्त्रीचे कौटुंबिक जबाबदाऱ्यांना जखडणे असेच मानले गेल्यामुळे अनेक स्त्रियांनी स्वत:ला स्वयंपाकापासून दूर ठेवले. स्वयंपाकाचा भार एकट्या स्त्रीवर न पडता तो घरातील सर्वांमध्ये विभागला जावा हे चळवळीला अभिप्रेत होते. मात्र, पुरुषांनाही स्वयंपाकघराकडे वळवण्याऐवजी चळवळीकडून नकळत स्त्रीलाही स्वयंपाकघराकडे न फिरकण्यास प्रोत्साहन मिळाले. परिणामी पुरुषाएवढीच तरुण, नोकरदार स्त्रीसुध्दा ‘करून खाण्याबाबतीत’ परस्वाधीन होताना दिसू लागली. सुदैवाने गेल्या दशकापासून अनेक स्त्रीवादी कार्यकर्ते ‘स्वयंपाक हे जीवनावश्यक कौशल्य असून ते नसणे हे भूषण नसून पराकोटीचे परावलंबन होय अशी मांडणी करू लागले आहेत व गरजेपुरता स्वयंपाक करता येणे हे स्त्रीप्रमाणे पुरुषाकडूनसुध्दा अपेक्षिले जाऊ लागले आहे. 

जागतिकीकरणाने मूळ धरल्यानंतर सर्वत्र खाद्यसंस्कृती जाहिरात क्षेत्राच्या आणि बाजारव्यवस्थेच्या अधीन होताना दिसून येत आहे. ‘झटपट’ अर्धतयार पदार्थांवर नोकरदार वर्ग विसंबून राहू लागला असून त्यातच प्रोटीन डाएट, किटो डाएट, व्हेगन डाएट अशा वेगवेगळ्या तथाकथित आरोग्यवर्धक पूरक पदार्थांचे वेड तरूण पिढीला लावण्यात जाहिरात कंपन्या यशस्वी झाल्या आहेत. आज शहरी, सुखवस्तू तरुण-तरुणी सकाळी नाश्ता न बनवता  बाजारात मिळणारे अत्यंत महाग पूरक पदार्थ खाऊन कामाला जाताना दिसतात. महानगरांमधील उच्चविद्याविभूषित तरुणांना पारंपरिक, सहजी उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त अन्नपदार्थ पोषणदृष्ट्या कमअस्सल असून ते खाणे म्हणजे अडाणीपणा वाटतो. या अवाजवी महाग पदार्थांमध्ये ‘आरोग्यविघातक’ घटक कदाचित नसतीलही, परंतु ते जेवढा दावा करतात, तेवढे पोषक घटकही नसतात. मात्र ते खाणे सोयीचे, वेळबचाऊ असते, शिवाय त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली असल्याने बरेचसे तरुण त्यावर खूप पैसा ओततात. भरीला झिरो फिगरचे अतोनात अप्रूप असल्याने अनेक तरुणींना खाणे पापसमान वाटू लागले आहे. विशिष्ट वर्गात अन्नग्रहणाविषयी एक प्रकारचा रोगट दृष्टीकोन तयार झाला असून त्याचे सावट आपल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेले दिसून येते.

बाजारव्यवस्था जाहिरातींमधून खाद्यसंस्कृतीस निराळे वळण देत असते. त्याचे भले-बुरे परिणाम समाजाच्या आहारसवयींवर होत असतात. त्याचा उहापोह पुढील अंकात अंजनी खेर या अभ्यासक करतील.

करुणा गोखले, पुणे

karunagokhale@gmail.com