स्त्री चळवळीचा परिणाम लेखांक 2 खाद्यसंस्कृती: खाऊन पिऊन अनारोग्य!

अंजनी खेर संस्कृतीकारण
०१ मे २०२४

एकेकाळी आम्ही संध्याकाळी, आईचा स्वयंपाक तयार होण्याची वाट बघत बघत शुभंकरोती म्हणायचो, त्यातली ही एक महत्त्वाची संकल्पना. पण ही संपदा नियमितपणे परवचा म्हटला म्हणून मिळत नाही. ती मिळायला आणि टिकवायला आजच्या काळात तरी खूप विचारपूर्वक आणि निश्चयपूर्वक जगावं लागतं, हे कळायला आणि वळायला खूप वेळ जातो.

मला वयाच्या पंचविशीच्या आसपासच तब्येतीचे त्रास जाणवू लागले. बी.एच्या शेवटच्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण जमिनीवर मांडी ठोकून, वह्या पुस्तकांचा पसारा घालून अभ्यासाला बसायचो. १५-२० मिनटात माझ्या कंबरेला रग लागायची आणि मी जमिनीवर आडवी व्हायचे. तिला तासभर बसली तरी रग लागत नसे. जोडीला सर्दीही होतीच. पाळीत पहिले-दोन दिवस उलट्या आणि पोटदुखी.

त्याच सुमाराला म्हणजे १९७५ च्या आसपास विद्याताईंच्या संपादनाखाली ‘स्त्री’ मासिकाने आपला चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. केशभूषा आणि भरतकामाचे नमुने बंद झाले. इतर नेक आणि विचारप्रवर्तक लेखनाच्या जोडीला मालती कारवारकर आणि विजया साठे ह्या आरोग्य आणि आहाराविषयी लिहू लागल्या. कुठले अन्नघटक अत्यावश्यक, ते कसे मिळवावेत, कसे शिजवावेत हे सांगू लागल्या. आणि हे अजिबात दुर्बोध नव्हतं. सहज पटण्यासारखं होतं. अगदीच अपरिचित काहीही नव्हतं. फक्त आधुनिक ‘सुगरण’ होण्याच्या नादात बऱ्याच बायका परंपरा विसरू लागल्या होत्या. मालती कारवारकरांनी सांगितलेलं, पोळीचं मिश्र पीठ मी आजतागायत वापरते आहे. मात्र, अचानक जगभर सोयाबीनचा मोठ्ठा प्रचार सुरू झाल्यावर काही लोकांनी जागतिक स्तरावरच्या कंपन्यांचा संशय घेऊन संशोधन केले आणि काही प्रश्न उभे केले. आयुर्वेदाला सोयाबीन मान्य नाही. या सर्व गोष्टींचा मागोवा घेऊन मालती कारवारकरांनी काही उत्तर किंवा स्पष्टीकरण दिलेले माझ्या पाहण्यात नाही. मग, मी सोयाबीनऐवजी अख्खा हरभरा किंवा हरभरा डाळ वापरायला सुरुवात केली.

त्याच सुमाराला योगाभ्यासाला चांगले दिवस आले. जिकडे तिकडे योगासनांचे वर्ग सुरू झाले. तीन-चार महिने शिकल्यानंतर घरीच अभ्यास करण्यासाठी लागणारी जागा, खाजगीपणा मात्र दुरापास्त होता. मात्र, आपल्या तब्येतीसाठी आपणच श्रम घ्यायला हवेत, डॉक्टरांची गरजच पडू नये यासाठी आपणच आपला आहारविहार सुधारायला हवा, हे पक्कं उमजलं होतं. त्या सुमाराला ’माहेर’ मासिकानेही मंगला गोडबोल्यांच्या संपादनाखाली रूप बदललं होतं. अशा सर्व स्त्रियांच्या लिखाणाने बराच बदल घडवला. अडचणींना तोंड देत देत अनियमितपणे का होईना मी व्यायाम करत राहिले आणि त्याचाही उपयोग झाला. व्यायाम बंद पाडणारी अनेक खरीखोटी कारणं सामान्य संसारी स्त्रीच्या आयुष्यात आजही उद्भवत असतात. पण एवढ्या बाबतीत तरी स्त्रीने आपले प्राधान्य फालतू कौटुंबिक कारणासाठी बदलू नये. धार्मिक-कौटुंबिक कार्यक्रम ही चैन आहे, ती आपल्यासाठी नाही असे समजावे.

माझ्या आई-सासू यांच्या पिढीनेच आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती सोडून द्यायला सुरुवात केली होती. त्या पिढीने प्रचंड प्रमाणात डालडा वापरला आहे. लाडू, शंकरपाळे, शिरा, पुऱ्या या रूपात भरपूर डालडा आमच्या पोटात गेला आहे. मला त्यावेळची डालडाची एक जाहिरात चांगली आठवते. पूर्ण पानभर, पण तिला एक बारीक नक्षीची चौकट होती. लघुकथेचा फॉर्म होता. नुकतंच लग्न झालेली एक स्त्री. संध्याकाळी नवरा कामावरून घरी येण्याची वाट पाहत आहे.  तिने घराची साफसफाई केलेली आहे. फुलाफुलाच्या नक्षीचे पडदे लावले आहेत, फ्लॉवरपॉटमध्ये नवी रंगीत फुलं लावली आहेत. स्वतःची वेणीफणी, पावडर-कुंकू. तो १९६०-६१ चा काळ होता. आटोपले आहे. नवरा घरी येतो, पण त्याचा मूड ठीक नाही. ती त्याला हसवण्याचे अनेक प्रयत्न करते. तरी तो दुर्मुखलेलाच. शेवटी तिला युक्ती सुचते. ती डालड्यात पुऱ्या करून खायला घालते. एक पुरी पोटात गेल्याबरोबर ताबडतोब मूड खुलतो की हो! त्या काळात बऱ्याच बायकांना खरोखरीच जाहिरात आणि अन्य मजकूर यातला फरक कळत नसे. छापून आलाय म्हणजे ते खरं ! (आज तरी विशेष फरक पडलाय का?) स्वस्त असल्यामुळे अमाप डालडा वापरला जायचा. त्यामुळे सणासुदीला पुऱ्या डालडात. शिवाय, त्यात ड जीवनसत्त्व घातलेलं आहे, असंही ती जाहिरात सांगायची. त्यामुळे तर बिनधास्तपणे डालडा वापरला जायचा.

आणि रोजच्या पोळीलाही डालडाच. तीच स्थिती जिलबीचा रंग, सोडा, मैदा वगैरे पदार्थांबाबत होती. आज ते रिफाईंड तेलाबाबत होत आहे. रिफाईंड म्हणजे अतिशय शुद्ध असं बऱ्याच सुशिक्षित स्त्रियांनाही वाटतं. आम्ही सर्व पदार्थ रिफाईंड तेलात बनवतो, अशी निवेदनं हॉटेलांमध्ये दिसतात. वास्तवात हे तेल उकळून उकळून त्याची चव, वास, स्वाद, रंग सर्व काढून टाकलेलं असतं. मग ते वर्षानुवर्षे टिकायला काहीच अडचण नसते. पण इतकं उकळलेल्या तेलातून आपल्या पोटात काय जातंय याचा विचार?

ब्रेड, तऱ्हेतऱ्हेची बिस्किटं, गोळ्या, हे पदार्थ जणू लहान मुलांचा अनन्य हक्क. तेही खूप खायची त्या काळातली मुलं. पांढऱ्या  साखरेचा सढळ हाताने वापर असे. काळपट रंग येतो म्हणून गूळ नो नो. पालेभाज्या कोरड्याच चिरायला बऱ्या पडतात म्हणून आधी चिरून नंतर पाण्यात घालणाऱ्या बायका मी अजून बघते. बटाटे, आंबे वगैरे फळं चार सेकंद पाण्याखाली धरली की झाली स्वच्छ. सगळ्यात शेवटी करावी अशी गोष्ट म्हणजे कोशिंबीर, ती सुरुवातीलाच हातावेगळी करायची. गॅस वाचवायला एकदा कुकरभर भात लावून दोन दिवस थोडा थोडा खायचा अशा काटकसरीबद्दल अनेक विचित्र कल्पना होत्या. म्हणजे खाऊनपिऊन अनारोग्य !

हळूहळू मी हे निश्चयपूर्वक बदललं. त्याबद्दल टोमणे, उपहास वगैरे मिळत असत त्याकडे दुर्लक्ष करायला जमलं. पोळीला साजूक तूप लावणं परवडत नसेल तर साधं गोडं तेल लावावं. साखरेच्या जागी गूळ वापरावा. गेली २५-३० वर्षं सेंद्रिय गूळ लहान दाण्यांच्या स्वरूपात मिळतो आहे, तो वापरायला अगदी सोपा आहे. रोज कोशिंबीर करायला वेळ नसेल तर काकडी, टोमॅटो, बीट वगैरे नुसते चिरून खाल्ले तरी पोषण मिळतंच.

मी अजून एक निश्चय केला, तो म्हणजे ‘सुगरण’ ह्या कौतुकाला बळी पडायचं नाही. पाकातले लाडू, वड्या, साटोऱ्या वगैरे मला येत नाही, असं मी मान्य करून टाकलं. आधुनिक सुगरणी करतात त्या केक्स, जेली, कुकीज हेही मला येत नाही, हे मी ताबडतोब मान्य करत असे. ह्या गोष्टी खायची फार तीव्र इच्छा झाल्यास बाजारात कितीतरी सुगरण दुकानदार आहेत. मात्र दुधावरची साय साठवून विरजण करणे, हे मी नियमितपणे करते. आठवड्यातून दोनदा ताजं ताक आणि लोणी व्हायलाच पाहिजे असा शिरस्ता ठेवला. त्यामुळे अमुलपेक्षा चांगलं लोणी मिळतं. लोणची घरीच घालायची, चटण्या घरी करायच्या, कडधान्याला मोड घरी काढायचे, भाजणी आपणच करायची ह्या गोष्टी पाळल्या.

आज खाद्याशिक्षणासाठी एक महत्त्वाचं नाव आहे- ऋजुता दिवेकर. ती झीरो फिगरवाल्या प्रसिद्ध आणि उच्चभ्रू श्रीमंत मंडळींची सल्लागार असली, तरी ती तिचं आधुनिक ज्ञान पुस्तकं लिहून सामान्य माणसांनाही भरभरून देते आहे. तिच्या शैलीत हलका उपरोध, थट्टा, आत्मटीका असं सगळं आहे. त्यामुळे ते अतिशय उत्सुकतेने वाचलं जातं आणि सहज उपयोगातही आणलं जातं. तिचं म्हणणं साधंसरळ आहे. खूप लांबून म्हणजे अनेक foodmiles पार करून आलेले पदार्थ खाऊ नका. तुमच्या आसपास उपजलेले, ज्यांना तुमच्या भाषेत नाव आहे, असे पदार्थ वापरा. आणि तुमच्या आज्या जसा स्वयंपाक करत होता तसा करा, तसं खा. म्हणजे मधल्या एका पिढीने पारंपरिक शहाणपणा बराचसा सोडला होता (असं जे माझं म्हणणं आहे, त्याला हा दुजोराच आहे) तसं करू नका.

शिवाय, पुरुषांनीही घरकामातला आपला वाटा नीटपणे पार पाडला पाहिजे, ‘मदत’ नव्हे, असं ऋजुता ठासून सांगते. डॉ. शरदिनी डहाणूकर यांचं ‘स्वस्थवृत्त’ हे पुस्तकही खूप उपयुक्त आहे. ह्या स्त्रिया जरी थेटपणे स्त्री चळवळीशी जोडलेल्या नाहीत. म्हणजे मोर्चा, धरणे, निदर्शने अशा प्रकारे त्या चळवळीशी थेट जोडलेल्या नसल्या, तरी ह्या चळवळीची मूल्ये  आणि तथ्ये घेऊन आपापल्या क्षेत्रात काम करत चळवळीला बळच देत आहेत. अनेक पुरुष डॉक्टर्सही आरोग्याविषयी लिहित असतात, परंतु ह्या स्त्रियांनी स्वयंपाकात जे मूलगामी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केले ते महत्त्वाचे आहेत. पुरुष डॉक्टर्स अशा प्रकारे लिहित नाहीत.

लहानपणी झिम्मा-फुगडी खेळत होतो, त्या काळात दोडक्याची फोड गोड लागते असं एक गाणं होतं.  पण गाण्यातली ही गोड फोड प्रत्यक्षात तेवढी प्रिय नव्हती. दोडका, दुधी, घोसाळी ह्या सौम्य, गोडसर चवीच्या भाज्या “पानात पडेल ते अजिबात कटकट न करता खायचं!” ह्या शिस्तीच्या बडग्यामुळे पहिलं वाढप एवढ्याच कशाबशा खाल्ल्या जायच्या.  पुन्हा घेण्याचं नाव नसायचं.  घोसाळी निदान भजी या स्वरूपात थोडी आकर्षक होती. पण दुधी, दोडका, घोसाळी ह्यांना खमंग आणि आकर्षक करण्याचं आई, आजी वगैरे बायका काही मनावर घेत नव्हत्या.  दुधीबाबत दुधीहलवा ही एक भारी चीज आहे, पण दोडका खरच दोडका होता;  म्हणजे लाडका होण्याचे कुठलेच गुण त्याच्यात नव्हते.

पुढे मी स्वतः सजगपणे स्वयपाक करायला लागले. पतीदेवांना न आवडणाऱ्या भाज्याही करायला लागले. मालती कारवारकर, विजया साठे वगैरे तज्ज्ञ स्त्रियाच्या लेखनातून मला जी जाण आली होती; त्यामुळे मग दोडका, दुधी, घोसाळी हा प्रश्न माझ्यापुरता हाती घ्यावासा वाटू लागला. विशेषतः माझ्या तान्ह्या मुलाला अॅनिमल प्रोटीन्सची अॅलेर्जी निघाली. त्यामुळे गाय किंवा म्हशीचं दूध देण्याचा पर्याय नव्हता. तेव्हा ब्रेस्ट फीडच्या जोडीला दुधी-दोडक्याच्या सूपची मोठीच मदत झाली. ह्या सौम्य, गोडसर चवीच्या भाज्यांचं महत्त्व पुरेपूर पटलं.

पण शिजवल्यावर एकदम मऊ पडणाऱ्या ह्या भाज्या एरवी मोठ्या प्रौढांसाठी वापरात आणाव्यात तरी कशा? खिचडीत, साध्या भातात किसून घालून, मुटके करून, सुपात, सारात, पावभाजीत असं दुय्यम स्थानावर वापरत होते. पण यात थोडी लपवाछपवी होती.  भाज्यांना त्यांचं योग्य स्थान उघड मिळत नव्हतं. मला वाईट वाटायचं. जसा कोकणात फणस तसा देशावर दोडका असं वाटायचं.  बाह्य रूप गोंडस नाही, उलट चरबरीत, खरबरीत रेषांचं. पण आत फणसाइतका गोड नसला तरी मृदू, शुभ्र ऐवज. भाज्यांशी फाईन ट्युनिंग जुळवून, भाविकपणे मनोमन आस्वाद घेणाऱ्याला भावेल असा. त्यामुळे मी स्वतःच दोडक्याच्या सौम्य-गोडसर चवीचा आब राहील अशी रेसिपी शोधली. ती अशी : दोडका ओला न करता टिश्यू पेपरने किंवा मऊ ओल्या कापडाने पुसून घ्यावा. शिरा आणि सालं किसून काढावीत. ती मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब, जिरं, मीठ या सह तेलात परतून घ्यावीत. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावं. किंचित भरभरीत राहू द्यावं. अगदी घोटीव, बारीक वाटू नये.

 दुसरा प्रकार म्हणजे चोचवलेल्या दोडक्यात चटणी न घालता डाळिंब दाणे, मक्याचे दाणे, कोवळे हरभरे, मटर  यापैकी काहीतरी आणि जिरे-मिरेपूड, मिरची घालून दह्यात कालवावं.

तर खाद्यसंस्कृतीची ही व्यावहारिक बाजू. पारंपारिक ज्ञानही तपासून घेतले पाहिजे, आधुनिक ज्ञानही मिळवले पाहिजे आणि ह्या दोन्हीचा संयोग करण्याचं चातुर्यही!

अंजनी खेर, पुणे

anjookher@gmail.com