पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेतली स्त्रीची पारंपरिक भूमिका नाकारण्याचं स्वातंत्र्य आणि बळ स्त्रीमध्ये आहे. हा आत्मविश्वास स्त्रियांमध्ये जागवण्याचं काम स्त्री चळवळीनं केलं. मात्र आजही अनेकांच्या मनात स्त्री स्वातंत्र्य हा भयावह आणि नकोसा वाटणारा विचार आहे. कारण त्यामुळे कुटुंब मोडणार, स्वैराचार होणार समाजाची मोडतोड होणार अशा अज्ञान आणि गैरसमजावर आधारलेल्या स्त्री वादाविषयीच्या कल्पना त्यांच्या मनात या व्यवस्थेनं रुजवल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी स्त्रीवाद म्हणजे नक्की काय? स्त्रीवाद हा अवघड पंथ कसा नाही? माणूस सजग झाला की त्याच्यात स्त्रीवाद कसा सामावला जातो? आदी प्रश्नांविषयीची दिलखुलास चर्चा स्त्रीवादा विषयी प्रगल्भ दृष्टी आणि आकलन असणाऱ्या साऱ्याजणीच्या सर्जनशील लेखक सखीनं केली आहे. आजच्या धार्मिक कर्मकांडाचा उन्माद चढलेल्या वर्तमानात स्त्री चळवळीनं पुन्हा एकदा सह-अनुभूती, सर्वांप्रती करुणा, समभाव असणाऱ्या स्त्रीवादाची मांडणी ठामपणे करण्याची गरज यात अधोरेखित केली आहे. आज स्त्रीच्या ढोंगी-दांभिक-उदात्ती करणाच्या चौकटीत स्त्रीवादाला अडकवण्याचं राजकारण, संस्कृतीकारण व समाजकारण कसं केलं जात आहे, ही या चर्चेतली धोक्याची घंटा आपण सजगतेनं ऐकायला हवी.
मा झ्या लिहिण्याची सुरुवात आधी झाली. कविता-कथा लिहीत गेले, तेव्हा मनात जे उफाळत असे ते शब्दातून मांडण्याचा आनंद होता. आपण त्या त्या काळात काय वाचत असतो काय पाहतो, कसा विचार करतो त्यानुसार आपल्या जाणिवांची वाढ होत असते. भोवतालच्या अनेक गोष्टी, आपली परिस्थिती, माणसं, घरातलं आणि बाहेरचं वातावरण याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विचारांवर होत असतात. तशी वाढ होताना नेमक्या सत्तरच्या दशकात पुण्यात कॉलेज शिक्षण घेत होते. तो काळ आपल्याकडे स्त्री-चळवळ सुरू होण्याचा होता. मात्र, ती चळवळ थेट माझ्यापर्यंत येऊन पोचली, असं झालं नाही.
असा आढावा आपल्याला नंतर मागे वळून पाहतानाच घेता येतो. तुम्ही प्रत्यक्षपणे एखाद्या लाटेत ओढला गेला असाल, तर ती वाट ठळकपणे लक्षात राहते.अमुक एका विचारसरणीचा प्रभाव पडत गेला, ही बाब अधोरेखित होते. पण त्या काळात जगताना आणि लिहिताना अशा लाटेत ओढल्या गेल्याचा अनुभव आला नाही. ती लाट भोवती आहे, याची जाणीव होती. तरीही, माझी विचारसरणी स्वातंत्र्य, समानता, आचार आणि विचारांचा मोकळा अवकाश या संकल्पनेभोवती फिरत होती. याचं कारण काय असावं?
एक तर माझ्या वाट्याला आलेलं घरातलं पुरोगामी म्हणावं असं वातावरण. या गोष्टींचा उच्चार पुन्हा पुन्हा होत राहतो. कारण हे फार महत्त्वाचं आहे. ज्यांना हे लाभतं त्यांना आपली शक्ती विनाकारण विरुद्ध विचारांशी भांडण्यात घालवावी लागत नाही. अनेकदा मुली घरच्या ठरीव विचारसरणीतच वाढतात आणि ती आपलीशी करतात. कारण त्यांना प्रश्न विचारण्याची किंवा वेगळा काही विचार मांडण्याची मोकळीक नसते. शिवाय, तशा काही विचारांचं वारं लागलंच तर मग मोठ्या लढाईची परिस्थिती उद्भवते. बऱ्याच मुली ती हरतात किंवा इतर फायद्यांसाठी आपली वाट सोडून देतात. अगदी थोड्या काही वेगळी वाट शोधतात. पण त्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात. मोठी किंमत द्यावी लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री चळवळीत प्रत्यक्ष काम करणारी अशी मंडळी माझ्या लगतच्या वर्तुळात नव्हती. विद्याताई बाळ यांची ओळख आधी संपादक या नात्यानं झाली होती. नंतर हळूहळू त्यांचं काम समजलं आणि मैत्रीही झाली. मात्र, त्याआधी मी पहात होते त्या मध्यमवर्गातली घरं आणि तिथली माणसं जिथे माझ्या मैत्रिणी होत्या, ती सगळी एका ठरावीक रस्त्याने चालणारी होती. मुलींना शिक्षण देणं मान्य आणि जरुरीचं होतं; पण ते ठरावीक चाकोरीतलं असायचं. शिवाय, शिक्षण आणि काम-करियर हे स्वीकारलं असलं तरी लग्न महत्त्वाचं होतं. आणि ‘लग्नानंतर तिकडून परवानगी असेल तर मग काय हवं ते कर’, असाच पक्का विचार. काय हवं ते म्हणजे पुढचं शिक्षण आणि नोकरी. तेही ‘घरचं सारं सांभाळून’. त्याऐवजी नव्हे. याखेरीज कुटुंब, इतर नातीगोती, सण-समारंभ-कुळाचार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना जन्म आणि त्यांचं संगोपन इत्यादि सगळ्याची जबाबदारी त्या मुलीच्या खांद्यावरच यात काही संशय नसे.
आज हे लिहिताना जाणवतं आणि खंत वाटते की, अशा विचारात फार काही मोठा फरक पडला आहे, असं दिसत नाही. म्हणजे एकंदरीत स्त्रीचं स्थान, तिची भूमिका आणि आखून दिलेली कर्तव्य यांची चौकट खूप बदलली आहे, असं दिसत नाही.
मग ती स्त्री चळवळ सुरू झाली, असं आपण म्हणतो त्याचं स्वरूप काय होतं आणि त्याचा प्रभाव लेखिका म्हणून काय झाला? जागतिक चळवळीचा आढावा अभ्यासक घेतात. तो विस्तृत विषय आहे. जागतिक पातळीवरच पुरुषसत्ता मान्य आणि रूढ होती. बायकांच्या वाट्याला दुय्यम आयुष्य होतं. निर्णयाचं स्वातंत्र्य नव्हतं. समस्त स्त्री वर्गाचा विचार, त्यांची उपयोगिता आणि उपभोग एवढ्याच पध्द्तीने होत होता. हे चित्र सार्वत्रिक होतं. जगाच्या सगळ्या भागात, वेळोवेळी समर्थ स्त्रिया असत आणि आपापल्या परीने त्यांच्या जगात काहीएक काम करत, बदल घडवत. पण अनेकींची इतिहासात तशी नोंददेखील घेतली न गेल्याची उदाहरणे आहेत. फार काळाने कुणीतरी अभ्यास आणि संशोधन करून कष्टपूर्वक त्यांच्या कामगिरीबद्दल जगाला जाणीव करून दिली आहे. काही थोड्या स्त्रियांचे उल्लेख झालेही असतील पण ते अपवाद होते. आपण एकंदर स्त्री वर्गाचा विचार करतो, तेव्हा कुठले निष्कर्ष समोर येतात ते महत्त्वाचं.
त्यामुळे स्त्री चळवळीची सुरुवात जगभर झालेली असली तरी मोठ्या प्रमाणात हे विचार कसे, कुठे पोचले ते पाहणं जरुरीचं आहे. आपल्या भोवताली पाहिलं, तर आधी शहरातून अशा विचारांचा प्रसार होणं स्वाभाविक आहे. मग ते सावकाश इतर भागात, समाजाच्या इतर वर्गापर्यंत पोचतात. शिवाय, प्रामुख्यानं बुद्धिजीवी मध्यमवर्ग यात असतो. त्यांना वाचन, चर्चा, विचार करून काही एक बदल घडवून आणण्याची संधी आणि अवकाश परिस्थितीनं दिलेला असतो. कष्टकरी समाजात बाया घरीदारी काम करतात, साऱ्या संसाराची जबाबदारी घेतात; तरीही, त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नसतं आणि त्यांच्यावर पारंपरिकरीत्या हुकमत गाजवली जातेच. त्यांच्यापर्यंत हे विचार पोचायला वेळ लागणारच. शिवाय, त्यांच्या भोवतालची परिस्थिती बदलांना अनुकूल नसते. कुठलीही मदत मिळत नाही. त्यांच्या रोजच्या आयुष्याचं केंद्र पोटापाण्याला मिळवणं आणि जगत राहणं एवढंच असू शकतं. दुसरीकडे ज्यांना आपण मध्यमवर्ग म्हणतो, त्यांना शिक्षणाची संधी असते आणि बदल घडवून आणण्याची मुभा मिळू शकते. याकरता त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात.
पुण्यासारख्या शहरात एकंदरीत त्या काळात पुरोगामी म्हणावं अशा विचारांचं वातावरण होतं. पण तरीही सगळेच त्याची दखल घेत होते, असं नाही. उलट कुठलेही बदल -विशेषत: विचारातले बदल- लोकांना नको असतात. त्यांची भीती वाटते. आहे त्यात समाधान आहे, अशी धारणा असते. स्त्री-स्वातंत्र्य हा तर जणू भयावह आणि नकोसा विचार. कारण जणू बाई स्वतंत्रपणे विचार करून वागायला लागली की, ती घराबाहेरच पडणार, कुटुंब मोडणार, तिची तथाकथित कर्तव्य करणार नाही. थोडक्यात, स्वैराचारी होणार. अशीच खोटी, दांभिक धारणा. ती पुरुषवर्गाला सोयीची. त्यांच्या हातात जणू लगाम होते आणि ते सैल झाले म्हणजे गुलाम सुटलेच त्यांच्या सत्तेखालून अशी भीती.
तेव्हा स्त्री-चळवळीला किती आणि कशा अडचणीतून जायला लागलं असेल याची कल्पना करता येते. यातून जी ‘स्त्रीवाद’ नावाची विचारधारा जन्माला येत होती, किंवा विसाव्या शतकात अनेक अभ्यासकांमुळे अधिकाधिक स्पष्ट होत होती. पण तिचा नीटसा अर्थ सगळ्यांच्या लक्षात येत नव्हता. माझ्यासारखीच्या वाचनात जे येत होतं, ते मला एक मुलगी म्हणून माझ्या विचारांशी जवळचं वाटत होतं. विशेषत: आपल्याकडे लेख आणि पुस्तकं यातून जे विचार पोचत होते, ते मला पटण्याजोगे वाटत गेले. म्हणजे स्त्रीवादामुळे मी लेखिका बनले असं नव्हतं. तर, माझ्या मूळच्या स्वतंत्र मनोवृत्तीमुळे मला स्त्रीवाद म्हणजे काय आहे, हे समजून घेणं सोपं गेलं. कुठलीही बाई ती केवळ स्त्री म्हणून जन्माला आली, या कारणाने कनिष्ठ ठरत नाही. ती माणूस आहे. आणि माणूस म्हणून जे काही स्वातंत्र्य कुठल्याही मानवाला उपलब्ध असतं, ते तिलाही आहे. आणि का नसावं? असा प्रश्न माझ्या मनात होताच. माझ्या सुरुवातीच्या लेखनातदेखील केवळ एक पात्र बाई आहे म्हणून तिनं अमुक तमुक करू नये, बोलू नये अशा तऱ्हेचे प्रसंग कधी आले नाहीत. तसा विचार माझ्या गावीही नव्हता.
‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ यासारखी मासिकं आणि त्यातून येणारे लेख यांचा परिणाम निश्चित होता. त्या काळात अशा सुधारकी विचारांचं वारं होतंच आणि ते वाहायला भरपूर अवकाश होता. त्यामुळे ‘हे असं स्वतंत्र, निर्भीड असायला पाहिजे’, अशी वाट बनत गेली. यात मुख्यत्वे आजवर गृहीत धरलेल्या संकल्पनांना प्रश्न विचारणं आणि नकार देणं हा भाग होता. आपले निर्णय आपण स्वत: घेणं, हे अपेक्षित होतं. यात खरं तर इतरांना त्रास किंवा दु:ख देणं वा इजा आणि हिंसा मुळीच नव्हती. गृहीतकांना आव्हान देणं मात्र निश्चित होतं. त्यात मग नाराजी, वादविवाद, विरोध इत्यादि सर्व आलंच. कुठल्याही आव्हानात ते असणारच. पण यात इतरांनीही समजून घेणं, विचार करणं, बदलांना सामोरं जाणं, अशा अपेक्षा होत्या.
लेखनाच्या वाटेवर अर्थात वय आणि अनुभव वाढत गेले, तशी समजूतदेखील अधिक प्रगल्भ झाली. स्त्रीवाद म्हणजे काय याची नीट जाणीव वाचन, विचार, मनन यातून बनत गेली. शिवाय, भोवतालच्या निरीक्षणातून अधिक कळत गेलं. एकंदरीत स्त्री चळवळ आणि त्यातली प्रमुख विचारधारा स्त्रीवाद. आपल्या आयुष्यात, जगण्यात आणि लेखनात याचा नक्की अर्थ काय हे समजून घेण्याचा तो प्रवास असं म्हणता येईल. याला अनेक पैलू आहेत कारण कुठलीच आचार-विचारधारा एकांगी नसते. पण काही मूलभूत पाया जरूर असतो. स्त्री-पुरुष समानता, माणूस म्हणून सर्वांना जगण्याचे सारखे अधिकार आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा हक्क. पुरुषप्रधान समाज आणि त्यानुसार बनत गेलेली संस्कृती यांना विचारलेले प्रश्न. यातून अर्थात काहींना नकार देणे, बदल घडवून आणणे अपेक्षित आहेच. त्याशिवाय ‘प्रगती’ शक्य नाही. साचलेपणा म्हणजे दबलेला आवाज आणि आयुष्य. प्रवाह वाहता राहायचा असेल, तर काही खळबळ अपरिहार्य आहे.
नातेसंबंधात मुळात रस असल्याने माणसांची एकमेकांशी असलेल्या नात्यातली गुंतागुंत मनोवेधक वाटत होती. लेखनातून त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न होता. कारण आपल्या लहानशा आयुष्यात आपण जन्मतो, वाढतो ते इतरांशी जोडून घेत. समूहाशी आपलं नातं असतं आणि यातली कुठलीच गोष्ट सोपी नसते. म्हणून मग ताण येतात. माणसा-माणसात येतात; तसेच, समूहातही येतात. एकंदर इतिहासाकडे नजर टाकली तरी कळतं की, लहान-मोठ्या लढाया असोत वा जागतिक युद्ध, माणसं सतत स्पर्धा करतात कारण सर्वांना सत्ता हवी असते. सत्तेचा उपयोग अनेक प्रकारे होतो. अधिकार हा माणसाला जगायलाच उद्युक्त करतो. फायदे मिळवून देतो.
साहजिकच पुरुषवर्गाची सत्ता आणि स्त्री-वर्गावर ती शतकानुशतके गाजवायला मिळाल्यामुळे झालेले पुरुषवर्गाचे फायदे आणि स्त्रीवर्गावर झालेले अन्याय यांची दखल आणि त्यात बदल हा स्त्री चळवळीचा गाभा राहिला. पण याचा अर्थ असा कधीच नव्हता की समस्त पुरुषवर्ग शंभर टक्के सत्ताधारी आणि अन्यायी होता आणि प्रत्येक स्त्री अन्यायाला बळी पडत होती. बहुतांशी असं चित्र असलं तरी काहीएक विचार करणारे पुरुष असणार होते आणि काही बायकादेखील समान हक्क आणि स्वातंत्र्य मिळालेल्या असू शकत होत्या. हे प्रमाण असमान आणि असमर्थनीय असणार हे उघड आहे. कुठल्याही समाजाची प्रगती समानता, न्याय या मूल्यांवरच मोजली जायला हवी. म्हणून मग कालांतराने स्त्री चळवळ आणि समाजाच्या तळाला ढकलले गेलेले इतर वर्ग, रंग, वंश, धर्म, जात यावर आधारित कृत्रिमरीत्या उभारलेले उच्च-नीच उतरंडीवरचे वर्ग, त्यांच्या चळवळी यांच्यातले संबंध लक्षात यायला लागले.
आपला असा प्रवास व्हायला लागला की, अवकाश विस्तारत जातो, समज वाढते आणि लेखनातदेखील झिरपते. तसं निश्चित झालं. इतकंच नाही, तर ज्या स्त्रीवादाशी मी विचारांनी मुळात जोडली गेले होते, तो आपल्या दृष्टीने नक्की काय व कसा आहे याचं भान अधिक जागृत व्हायला लागलं. आपलं लेखन आणि हे भान यांचा संबंध स्पष्ट होऊ लागला. ती विचारसरणी आपलीशी केली होतीच. पण पुष्कळ पुढे या अनुषंगानं ‘मानव अधिकार’ या संकल्पनेचा अधिक रीतसर अभ्यास करावा असं वाटलं. सुदैवानं तशी संधी होती. म्हणून मग नॅशनल लॉं स्कूलमधून मानवाधिकार कायदा असा डिप्लोमा कोर्स केला. वयाच्या पन्नाशीत वर्गांना बसणं, लेक्चर्स ऐकणं, लायब्ररीत बसून कसून अभ्यास करणं आणि मग उत्तम गुण मिळवून पास होणं याचा आनंद घेतलाच; पण यामुळे जागतिक पातळीवरच्या मोठ्या विषयांची ओळख झाली आणि एकंदर समज विस्तारायला खूपच मदत झाली. या प्रवासाचा उल्लेख करण्याचं कारण असंच आहे की, आपल्या लेखनातून जे विचार मांडले जातात त्यात भर कुठून कशी पडत गेली याचा आढावा घेणं.
स्वत:ची वाट अधिक शोधत जाणं, हा एक भाग झाला. बरोबरीने एकंदर साहित्य जगात काय चाललं आहे, ते थोड्याफार वाचनातून कळत होतं. स्त्रीवादाची जाणीव काही स्त्री आणि पुरुष लेखकांना होती आणि तो एक प्रवाह दिसत होता. दलित, ग्रामीण इत्यादि वर्गीकरणातून जसे अनेक लिहिणारे पुढे येत होते तसंच. तरीही, ‘आपण स्त्रीवादी नाही’ असं म्हणणाऱ्या लेखिका होत्या. स्त्रीवाद म्हणजे अतिरिक्त स्वातंत्र्य(?), स्वैराचार, कुटुंबाची आणि समाजाची मोडतोड, ‘अशा अज्ञान आणि गैरसमज’ यावर आधारलेल्या ढोबळ कल्पना होत्या. अजूनही आहेत. सर्वात मोठी व तितकीच चुकीची व्याख्या म्हणजे स्त्रीनं पुरुषासारखं होणं अपेक्षित आहे, अशी समजूत. सुरुवातीला अमुक एक पुरुषाला मिळतंय तर बाईला का नको असा विचार असणं स्वाभाविक होतं. पण याचा अर्थ बाईने पुरुष बनणं अजिबात नाही. हे मग स्त्री चळवळीनेही मान्य केलं. अशी स्पष्टता येत चालली होती, तरी बायकांनी आपण स्त्रीवादी नाही असं का म्हटलं? एखाद्या पुस्तकाचं परीक्षण लिहिताना ‘ही लेखिका/लेखक रूढ अर्थाने स्त्रीवादी नाही’, असं म्हणण्याची पद्धत होतीच आणि अजून दिसते. यामागे काय असावं ही अस्वस्थता तयार झाली.
यातून लक्षात आलं की, इतकी वर्षं गेली आहेत, स्त्रीचळवळीचा फायदा सगळ्यांना, विशेषत: मध्यम आणि सुस्थितीत असणाऱ्यांना इतका मिळालेला आहे. तरीही, ‘स्त्रीवाद’ म्हणजे नक्की काय, याचा या लोकांनी नीट विचार केलेला नाही. आता मुलींना शिक्षण घेण्याचा, काम करण्याचा, स्वत: कमावण्याचा अधिकार आपण गृहीत धरला आहे, मुली-बाईला स्वतंत्र मत असू शकतं हे मान्य केलं आहे, तिच्या जगण्याला काही प्रमाणात का होईना महत्त्व दिलं आहे, या साऱ्या गोष्टी काय आपोआप, विनासायास मिळत गेल्या आहेत? अगदी शंभर-दीडशे वर्षांपूर्वी आपण बायकांनी जन्म घेतला असता तर काय असतं आयुष्य? मग पाचशे-हजार वर्षांपूर्वीची तर गोष्टच सोडा. ही जाणीव केव्हा होणार? तर तसा विचार करून पाहिला तरच. काही प्रश्न विचारले तरच. पण सर्वसाधारणपणे जे मिळालं आहे, ते सहज गृहीत धरून त्यावर हक्क गाजवणं आणि मग बधिरपणे जगणं सोपं असतं. याचा तोटा केवळ जाणीव नसणे एवढाच होत नाही, तर अशा समूहाला भासमान, खोट्या, दांभिक रस्त्याने नेणं सत्ताधारी पुरुषवर्गाला आणि त्यांच्या कह्यात असलेल्या स्त्रियांनादेखील सहजसाध्य होतं.
जे होताना आज आपण पाहू शकतो. एकंदर स्त्री चळवळीचा आढावा घेताना अगदीच काही बदल झालेले नाहीत, हे आपण मान्य करतोच. पण अपेक्षित बदल जास्त असतात, ते अधिक वेगाने व्हावेत असं वाटतं. एरवी त्यासाठी प्रयत्न सुरू असतातच. शिक्षण आणि संधी अधिकाधिक स्त्रीवर्गापर्यंत पोचाव्यात असं वाटतं. आत्तापर्यंत वंचित असलेल्या स्त्रियांचा गट मोठा असतो, शहरातही मध्यमवर्गाखेरीज कनिष्ठ वर्गातल्या, कष्टकरी वर्गातल्या बाया असतात. लहान गावातच नव्हे तर दुर्गम भागात असलेल्या, विविध स्तरात विभागलेल्या बायका असतात. त्यांचे इतर, जगण्याचेच व्यामिश्र प्रश्न असतात. आणि स्त्रिया म्हणून ते जास्तच जटील होतात. तर हे सगळे घटक विचारात घेऊन स्त्रीचळवळीची वाटचाल व्हावी अशी अपेक्षा होती, असते. यात अडचणी असतातच आणि एकवाक्यता तर अर्थात नसते. त्यामुळे निरनिराळे मार्ग दिसतात आणि यश कमीअधिक प्रमाणात काही काळ, काही लोकांपुरतं मर्यादित राहू शकतं.
आता स्त्री-चळवळ अमान्य करता येत नाही आणि एकंदर स्त्रीवर्गाची वाटचाल स्पष्ट दिसतेच आहे. त्यामुळे बायका कशा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, कशी त्यांनी सर्व ‘पुरुषक्षेत्रे’ काबिज केली आहेत इत्यादि मान्य करावंच लागतं. विशेषत: जाहीर बोलताना, राजकारणी व नेते मंडळींना. तरीही, असा सूर सध्याच्या काळात काढला जातो आहे की, बायका नुसत्या आघाडीवर नाही आहेत तर कशा त्यांनी आपल्या पारंपरिक भूमिका नीट निभावल्या आहेत. आणि तरीही... हे महत्त्वाचं, की तरीही, त्या कशा हुशारीने दोन्ही आघाड्या ‘सांभाळून’ सर्व मिळवत आहेत.
म्हणजे ज्या ठरवून दिलेल्या पारंपरिक भूमिकेतून सुटण्याची धडपड करण्याची शक्ती चळवळीने दिली, स्त्रिया म्हणजे केवळ मुलगी, बायको, सून, माता इत्यादि नव्हेत तर त्याखेरीज माणूस आहेत, त्यांच्यात इतर माणसांच्या क्षमता आहेत आणि पूर्वीचे दबाव हे केवळ संस्कृतीच्या नावाखाली लादलेल्या भूमिका आहेत, त्यांचे उदात्तीकरण केले गेले आहे. ज्यामुळे समस्त स्त्री वर्गाला दुय्यम म्हणून वापरून घेता येते. शिवाय, त्या पारंपरिक भूमिका नाकारण्याचं स्वातंत्र्य आणि बळ स्त्रीमध्ये आहे, या सर्व विचारांना मोठ्या चतुराईने डावलून पुन्हा बाई म्हणजे तिनं हेही करावं आणि मग तेही करावं असा विचार गोड कौतुकाचा मुलामा देऊन पसरवला जातो आहे. कारण यातच तिच्या आयुष्याची कृतार्थता आहे, अशी पारंपारिक समजूत नव्यानं उजाळा देऊन गळी उतरवायची दांभिक, नासमज, धोकादायक मखलाशी आहे, हे कुणाला सहजी समजू नये हा उद्देश. याचं कारण काय असावं हे आपण पाहू शकतो. एकीकडे बायकांचं सामर्थ्य मान्य करावं लागतंय; पण इतके वर्षं तिच्यावर हुकमत गाजवली होती ती सहजी हातून सुटली तर काय ही धास्ती सत्ताधारी पुरुषवर्गाला वाटते. मग उपाय काय तर पुन्हा एक खोटं उदात्तीकरण. स्वत: बायकांना यातच कृतार्थता वाटते. याचं कारण शतकानुशतके तयार केली गेलेली मनोधारणा. चळवळीनं नेमकं ज्या विचारधारेला आव्हान दिलं, प्रश्न विचारले त्याच धारणा मुरड घालून पुन्हा एकदा उजळ करायचा हा ढोंगी रस्ता. नेमक्या याच कारणासाठी आपण सर्वांनी ‘स्त्रीवाद’ म्हणजे नक्की काय याचा अभ्यास करून तो आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर प्रत्यक्षात आणायला हवा. साहित्य आणि वाचन हे ते करण्याचे सोपे आणि तरीही सर्वव्यापी मार्ग आहेत. या काळात स्त्रीवाद आपल्या साहित्यातून अर्थात प्रकट होत राहिला होता. तो लेखक-लेखिका त्यांच्या आयुष्यात कसा विचार करत आहेत आणि मग त्यांची स्त्रीवादाबद्दलची धारणा आणि समज काय आहे, यावर अवलंबून असणार हे उघड आहे. आपली अपेक्षा अशी असते की, साहित्यिक मंडळी विचारशील असतात आणि त्यांना अधिक समजतं त्यामुळे त्यांच्या लेखनातून समाजाला काही एक दिशा मिळू शकते. ही अपेक्षा अवाजवी नसली, तरी नेहमीच पूर्ण होत नाही. पण जे साहित्यिक समाज कसा आहे आणि कसा असू शकतो हे दाखवू शकतात. त्यांच्या लेखनातून अप्रत्यक्षपणे वाचकांना काही विचार मिळू शकतात.
मुळात चांगलं ललित साहित्य कुठल्याही ‘सामाजिक’ हेतूनं लिहिलेलं नसतं. तेव्हा समाजाला काही सांगावं असा आव देखील साहित्यिक आणू शकत नाहीत. मग साहित्य काय करतं? तर भावानुभव देतं. आपल्याला जगण्याबद्दलच अधिक काही मिळतं. एखादी प्रगल्भ दृष्टी आपोआप प्राप्त होते. आपल्याला प्रश्न पडतात त्यांची काही एक उत्तरं मिळू शकतात. निदान आकलन होऊ शकतं. एक दिशा मिळू शकते.
त्यामुळे साहित्यिकाचा दृष्टिकोण काय आहे, याचा अदमास तर सहज घेता येतो. स्त्रीवाद कसा दिसेल साहित्यातून? तर लेखनात आलेल्या स्त्रियांची आणि पुरुषांचीही पात्रं काय म्हणू पाहताहेत याचा अंदाज वाचकांना आला तर समजू शकेल. फक्त बायकांची दु:खं रंगवली म्हणजे स्त्रीवाद उमटतो असं अजिबात नाही. त्यांच्यावर आलेली संकटं, झालेले अन्याय असं साहित्यात आलेलं असलं म्हणजे साहित्यिकांना स्त्रीवर्गाबद्दल आस्था आहे आणि त्यांना खरोखर स्त्री चळवळीचं भान आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. साधं उदाहरण द्यायचं तर समजा एखादं स्त्री पात्र अडचणीतून जाताना कशा तऱ्हेने मार्ग काढते आहे, याचं चित्रण आहे. आपल्याला वाचताना हे कळत जातं की लेखकाच्या मनात त्याग, सहनशीलता, तडजोडी अशा प्रकारचा मूल्यभाव आहे की त्या स्त्री पात्राच्या अंतर्गत लढाईचा अदमास आलेला आहे, की ते पात्र लढून, संघर्ष करत, स्वत:चं बळ आजमावत पुढे जातं आहे. अनेकदा अशा गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या नसतात. एखादी लेखिका न सांगताही त्या पात्राच्या सामर्थ्याची, स्वतंत्र विचारांची वाट दाखवू पाहते आणि चांगल्या वाचकांना ते बरोबर लक्षात येतं. किंबहुना असं साहित्य अधिक भिडतं, विचार करायला लावतं. नकळत स्त्रीवाद म्हणजे काय याची कल्पना हळूहळू पण निश्चितपणे वाचकांनाच येऊ लागते.
यासाठी चांगले वाचक असणं अर्थात अभिप्रेत आहे. वाचन हे शिक्षणाशी निगडीत असल्यानं लिहा-वाचायला शिकणं, ती भाषा आत्मसात करणं, मग पुस्तकं हाती येणं, त्यासाठी वेळ देण्याची संधी मिळणं, तेवढंच नव्हे तर वाचन आणि विचार करण्याचा अग्रक्रम आयुष्यात ठरवणं या साऱ्या गोष्टी क्रमाक्रमानं महत्त्वाच्या असतात. कुठल्याही नव्या विचारांशी ओळख अशीच होते. बदलत्या धारणांना समजून घेणं, त्याचे फायदेतोटे जाणणं, ते आचार आणि विचारात सामावून घेणं हे केव्हा होईल? तर तसा सजगपणा वाढीला लागला तरच. पण सतत जुन्या चौकटीत अडकून गेलेली मनं बधीर होतात, बदल आणि नवं काही नको वाटतं, आहे ते कसं चांगलं, पूर्वीचं सगळं सरसकट श्रेष्ठ असा दबाव आदळत राहिला की स्वतंत्र विचारसरणी नष्ट होणारच. किंवा ती तयारच होणार नाही आणि अशा बधीर, भ्रमात अडकलेल्या समाजाला अनेक शतकं मागे घेऊन जाणं आणि त्यांच्यावर ‘राज्य’ करणं सुलभ होणार. मग मुलामा दिलेल्या खोट्या, ढोंगी वल्गना मारे लोकशाही, स्वातंत्र्य, समता इत्यादि का असेनात. त्या खरोखर काय आहेत, हे माहीत करून घेण्याची क्षमता मग लोकांच्यात शिल्लक उरणार नाही. आजच्या वर्तमानात जेव्हा धार्मिक कर्मकांडांचा उन्माद चढलेला आहे, अशा काळात तर स्त्री-चळवळीनं पुन्हा एकदा ठामपणे मांडणी करणं जरुरीचं आहे. ही वाट फार अवघड असणार यात शंका नाही.
कारण आज समजला जाणारा स्त्रीवाद अशा मुद्दाम रचलेल्या ढोंगी चौकटीत अडकला आहे. ज्यांना विचार करावासा वाटतो, विवेकबुद्धी वाढीला लावावीशी वाटते अशांनी तो स्त्रीवाद नक्की काय आहे, ते अभ्यासानं, चिंतनानं समजून घेतला पाहिजे. समानता आणि समता या संकल्पना खरं तर अगदी सोप्या आहेत. त्या साहजिक, नैसर्गिक आहेत. त्या अभ्यासल्या, कळून घेतल्या, मानल्या तर कुणीही माणूस समजून घेता येईल. एकमेकांना सन्मानानं वागवता येईल. सह-अनुभूती आणि सर्वांप्रती करुणा, समभाव अंगी बाळगता येईल. मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक निर्णय घेताना त्याचा अवलंब करता येईल.
एकदा तशी दृष्टी बनली की, सहजपणे आपण स्त्रीवादाचा अर्थ समजू शकतो. आपल्या सामाजिक व्यवहाराकडे नजर टाकली की, दिसतं स्त्रियांना अजूनही जमेस धरलं जात नाही. कुठल्याही क्षेत्रातले पुरस्कार असोत, एखादी समिती असो, जिथे पाच-सहा नावं असतात तिथे निम्मी संख्या स्त्रियांची असलीच पाहिजे. त्या पात्र नसतात का? तर जरूर असतात; पण तसा मुद्दाम विचार केला जात नाही. त्यांची गणना केली जात नाही. दुर्लक्ष केलं जातं. बहुतेकांना अशा गोष्टी बिन-महत्त्वाच्या वाटतात. पण त्या तशा नाहीत. अशा मुद्दाम घेतलेल्या निर्णयातूनच समतेचा मार्ग स्पष्ट होत जातो. जगभर मान्य झालेली ही व्यवस्था आहे.
स्त्रीवाद म्हणजे काही अवघड पंथ नव्हे. तो अगदी सगळ्यांच्या विचारात आणि आचारात सामावून जाणारा दृष्टिकोण आहे. आपण सजग माणूस असू तर आपण स्त्रीवादी असतोच, असायलाच हवं. कारण आपण मानवतावादीच असतो. पण आपण बधिर, ढोंगी, खोटे असू, तर मात्र काही समजून घेणंच अवघड आहे. कारण मग आपण कशाच्या आहारी गेलेलो असू. कुणा सत्ताधारी माणसाच्या मुठीत असू, आपल्या फायद्यासाठी इतर कुणावर अन्याय-अत्याचार करायला तयार असू.
शेवटी आपण कोण असायचं, हे ठरवणं सर्वस्वी आपल्या विचारांवर आहे. मुळात स्त्री-चळवळीचा आणि स्त्रीवादाचा तो मूलभूत गाभा आहे. तिथपासून करायची ती सुरुवात आहे.
सानिया, बेंगळूरू
saniya1011@gmail.com