प्रिय,
सस्नेह नमस्कार!
नवीन वर्षभरासाठी अनंत शुभेच्छा!
हे वर्ष समता, स्वातंत्र्य आणि मैत्रभावाच्या प्रकाशात उजळू दे! जगात अहिंसा आणि शांती नांदू दे, ही सदिच्छा! मिळून साऱ्याजणी मासिक समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय ही मूल्यं मनामनात जागी राहावी यासाठी आपल्याशी खुला पत्रसंवाद करू इच्छिते. ’ती, ते आणि तो यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी... मासिक नव्हे चळवळ!’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या मासिकानं पस्तिशीत पदार्पण केलं आहे.
१९७५मध्ये संयुक्त राष्ट्र महासंघानं (UNO) जागतिक महिला वर्ष आणि नंतर महिला दशक जाहीर केलं. या निमित्ताने महिलांना घरात आणि घराबाहेर येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत चर्चा सुरू झाली. २०२५मध्ये महिला वर्ष जाहीर झालं; या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होतील. महिला वर्षाच्या १९७५ ते २०२५ या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत स्त्री-चळवळीचं योगदान काय याचा थोडक्यात धांडोळा घेत स्त्री-चळवळ आपल्यापर्यंत किती आणि कशी पोहोचली? स्त्री-चळवळीविषयी आपल्याला काय वाटतं? हे समजून घेण्यासाठी हा खुला पत्रसंवाद! आपण स्वेच्छेनं मनमोकळेपणाने संवाद साधावा, ही प्रेमाग्रहाची विनंती! प्रथम आपली ओळख करून घेऊया. त्यासाठी कृपया आपली माहिती लिहा :
नाव : _____________________________________________________________________________
जन्मतारीख: ________________ शिक्षण : ___________________________
अंदाजे दरमहा आर्थिक उत्पन्न : _________________
पत्ता: _____________________________________________________________________________ संपर्क : _________________
जवळजवळ जगभर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आहे. या व्यवस्थेत लोकसंख्येचा सुमारे अर्धा भाग असणाऱ्या स्त्रियांना दुय्यम मानून त्यांच्या आचार, विचार आणि संचारावर अनेक बंधनं घातली जातात. मुलगी हे परक्याचं धन आहे, तिची अब्रू म्हणजे काचेचं भांड असं स्त्री-पुरुष दोघांच्याही मनावर बिंबवलं जातं. मुलगा हवाच कारण तो कुलदीपक! मुलीला वाढवताना आदर्श बाई होण्यासाठी ती सुंदर, प्रेमळ, सोशिक, त्यागी, सेवाभावी, कामसू, गृहकृत्यदक्ष इ. असावी आणि तिने घराला घरपण देण्यासाठी २४ तास झटावं. नवरा, मुलं, सासू-सासरे यांना जपत संसार हेच अंतिम ध्येय मानावं. असं बाईपण तिच्यात रुजवलं जातं. तर मुलगा वाढवताना तो दणकट, निर्भीड, मुळूमुळू न रडणारा, धाडसी, महत्त्वाकांक्षी, पैसा-मालमत्ता कमावणारा, संरक्षण करणारा असा असावा त्यातच त्याचं खरं पुरुषपण, मर्दानगी आहे, असं त्याला सांगितलं जातं. याचा अर्थ माणसाला लिंग जन्मानं मिळतं; मात्र, लिंगभाव म्हणजे पुरुषपण आणि बाईपण हे सामाजिक आणि सांस्कृतिक माहोलमध्ये घडवलं जातं. हे तुम्हाला माहिती आहे का? हो/नाही
पुरुषपणाच्या आणि बाईपणाच्या या अशा साचेबद्ध प्रतिमांमुळे दोघांचंही माणूसपण हरवतं असं स्त्री चळवळ मानते. कारण यातून स्त्री-पुरुष विषमताच जन्माला येते. अशा स्त्री-पुरुष विषमतेचा अनुभव तुम्हाला खालीलपैकी कोणत्या बाबतीत आला आहे का?
१) शिक्षण : हो नाही सांगता येत नाही
२) नोकरी : हो नाही सांगता येत नाही
३) घरकाम: हो नाही सांगता येत नाही
४) लग्न : हो नाही सांगता येत नाही
५) मुलं होण्याचा निर्णय : हो नाही सांगता येत नाही
६) पोशाख : हो नाही सांगता येत नाही
त्या त्या विषमतेविरुद्ध तुम्ही संघर्ष केला का? कसा?
हो नाही सांगता येत नाही
संघर्ष केला असेल तर कसा......
स्त्री चळवळीनं स्त्री-पुरुष विषमता घरात आणि घराबाहेर कुठे कुठे आणि कशी कशी आहे हे विशेषतः स्त्रियांच्या लक्षात आणून दिलं. ही विषमता दूर करण्यासाठी स्त्रीनं विचारी, समंजस, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी व्हावं, असं सांगत स्त्री चळवळीनं स्त्रीचं आत्मभान जागं केलं. या व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या स्त्रियांच्या समस्या आणि अडचणी म्हणजे स्त्री-प्रश्न! स्त्री-चळवळ ही स्त्री-प्रश्न दोन पातळ्यांवर सोडवण्यासाठी मुख्यतः प्रयत्न करते. पहिल्या पातळीवर स्त्री चळवळ कायदे, यंत्रणा, शासनव्यवस्था स्त्री-पुरुषांना समान न्याय देणारी व्हावी म्हणून आजच्या व्यवस्थेत स्त्रियांना येणाऱ्या अडचणी, समस्या समजून घेऊन त्या दूर होण्यासाठी प्रयत्न आणि संघर्ष करते. दुसऱ्या पातळीवर लोकांच्या मनात लिंगभाव समता रुजवण्यासाठी अन्यायकारक रूढी, प्रथा-परंपरा यांच्याविषयी चर्चा करत त्या दूर करण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करते. घराघरात स्त्रीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध स्त्रीनं बोलतं व्हावं असा प्रयत्न करते. यासाठी १९७५ नंतर विशेषतः शहरात अनेक महिला संघटना, संस्था समाजात काम करू लागल्या. आपल्याला अशा काही स्त्री संघटनांची माहिती आहे का? स्त्री संघटनांकडे आपण कधी काम करण्यासाठी अथवा मदतीसाठी गेला आहात का? हो नाही
१-२ संघटनांची नावं लिहा.
तिथला आपला अनुभव कसा होता? चांगला वाईट ठीक सांगता येत नाही
ऑक्टोबर १९७५मध्ये भारतात आणीबाणी घोषित झालेली असूनही स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद पुण्यात घेतली होती. महाराष्ट्रभरातल्या कामगार, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, देवदासी आणि मध्यमवर्गीय महिला ६००च्या संख्येने या परिषदेत उपस्थित होत्या. या परिषदेत संविधानात स्त्री-पुरुष समता असली तरी विविध क्षेत्रात स्त्रीला दुय्यम स्थानच कसं दिलं जात आहे, हे समोर आणलं. मुंबईमध्ये स्त्रीमुक्ती संघटना स्थापन झाली. त्या संघटनेनं 'मुलगी झाली हो' हे ज्योती म्हापसेकर यांनी लिहिलेलं हुंड्यासारखे ज्वलंत प्रश्न मांडणारं पथनाट्य सादर केलं. महाराष्ट्रभरात या प्रयोगांमुळे घराघरात स्त्री-पुरुष समतेचा संदेश पोहोचला. भारतात आणि परदेशातही ’मुलगी झाली हो’ हे नाटक सादर करून एक इतिहासच घडला. या नाटकांच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समता मनाला भिडत होती. मुलगी झाली हो, हे नाटक आपण बघितलं आहे का? हो नाही
हुंडाविरोधी कायदा होऊन अनेक वर्षं झाली, तरी आजही या ना त्या प्रकारे हुंडा घेतला जातो आहे, असं वाटतं का?
हो नाही
१९८४मध्ये पुण्यात शिक्षित सुखवस्तू घरातल्या मंजुश्री सारडा हिचा अनैसर्गिक मृत्यू आणि शैला लाटकरचा खून झाला. त्यानंतर शिक्षित सुखवस्तू घरात स्त्रियांवर हिंसाचार-अत्याचार होत नाही; या गोड गैरसमजाला तडा गेला. (पुण्यात नारी समता मंच या संघटनेने 'मी एक मंजुश्री' हे प्रदर्शन तयार केलं. ते अनेक संस्था-संघटनांनी महाराष्ट्रभर प्रदर्शित केलं. त्यानंतर हळूहळू लोक घरातल्या हिंसेविषयी बोलू लागले. महिलांना घरातल्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध बोलण्यासाठी ’बोलत्या व्हा’ हे केंद्र नारी समता मंचने सुरू केलं.) घरगुती हिंसाचारामुळे घर सोडावं लागणाऱ्या महिलांसाठी आपलं घर काही वर्ष चालवलं. स्त्रीवादी समुपदेशन केंद्र नारी समता मंचमध्ये आजही चालू आहे. आपण या संस्थांकडे गरज पडली, तर मदतीसाठी ११ ते ५ या वेळेत ९७६६१०३४५८ या नंबरवर संपर्क साधू शकता.
कुटुंबातील हिंसाचार, अडचणी, समस्या सोडविण्यासाठी आणि स्त्रीला न्याय मिळण्यासाठी कुटुंब न्यायालय स्थापन झाली आहेत हे आपल्याला माहीत आहे का? हो नाही
आपण कधी तिथे गेला आहात का? हो नाही
आपला अनुभव कसा होता? चांगला ठीक वाईट
२००५पासून कौटुंबिक हिंसाचार विरोधी कलम ४९८ असणाऱ्या कायद्यामुळे स्त्रीला कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध न्याय मिळू शकतो. आपल्या घरात, शेजारी अथवा माहितीत कुणी या कायद्याचा आधार घेतला आहे का?
हो नाही माहिती नाही
हिंसाचाराविरोधात मदत घेण्यासाठी आशा संस्थेची सखी हेल्पलाईन सकाळी ९.३० ते रात्री १० वाजेपर्यंत ९४२१०१६००६ या क्रमांकावर चालू आहे.
बलात्कार म्हणजे एक गंभीर मानसिक, भावनिक आणि शारीरिक-लैंगिक अपघात समजावा. त्यामुळे स्त्री कलंकित होत नाही, तर बलात्कारी पुरुष गुन्हेगार आहे, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी असं स्त्री चळवळ सांगते. आपण या विचाराशी सहमत आहात का? हो नाही
बलात्कार झाल्यास स्त्रीनं स्वतःला दोषी न मानता त्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली पाहिजे. त्यासाठी कायदा आहे, हे आपल्याला माहीत आहे ना? हो नाही
राजस्थानमधल्या दलित समाजातल्या अंगणवाडी साथीन भँवरीदेवी बालविवाह रोखण्यासाठी काम करत होत्या. तथाकथित उच्च जातीतला बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर नवऱ्यासमोर सामूहिक बलात्कार केला गेला त्याविरुद्ध त्या अनेक वर्ष संघर्ष करत आहेत. हे आपल्याला माहिती आहे का? हो नाही
बलात्कारित महिला कलंकित होत नाही, हे ठासून सांगण्यासाठी मिळून साऱ्याजणी मासिकाचे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते केलं होतं. भँवरीदेवीवर झालेल्या बलात्कारानंतर अनेक वर्ष संघर्ष केल्यावर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कायदा २०१३ मध्ये आला. याविषयी आपल्याला माहिती आहे का? हो नाही
‘मी टू चळवळ’ ही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाविरोधी आवाज उठवणारी जगभरातली प्रभावी चळवळ होती. २०१८मध्ये भारतात आणि महाराष्ट्रातही या चळवळीच्या माध्यमातून अनेक स्त्रियांनी आवाज उठवला. ऑफिसच्या बॉसविरोधात, नर्सेसनी डॉक्टरविरोधात इ. कामाच्या जागी लैंगिक शोषण होत असेल, तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी अंतर्गत तपास समिती असणं सर्व प्रकारच्या कार्यालयात बंधनकारक आहे. हे आपल्याला माहिती आहे का? हो नाही
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला म्हणून सख्खे आई, वडील, बहिण, भाऊ, मुलीच्या जीवावर उठतात. असं लग्न करणाऱ्या मुलीला मारून टाकण्यात कोणताही ऑनर नाही, असं स्त्री चळवळ मानते. या मताशी आपण सहमत आहात का?
हो नाही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री ही जातीचे प्रवेशद्वार आहे आणि म्हणूनच जातीच्या शुद्धतेसाठी तिची योनीशुचिता अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यातून स्त्रीला दास बनवलं गेलं आहे असं मांडलं. या मताशी आपण सहमत आहात का?
हो नाही
लैंगिकता जन्मापासून मरेपर्यंत माणसांच्या सोबत असते. निसर्गतः सुंदर असणाऱ्या लैंगिकतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलूंनी घेरून टाकलं आहे. स्त्री-पुरुषांच्या लैंगिकतेविषयी दुटप्पी नैतिकता रुजवत लैंगिकतेचं पुरुषप्रधान राजकारण या पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेत केलं आहे. त्याविरुद्ध स्त्रीचळवळीने जोरदार आवाज उठवला. स्त्री-पुरुषांसाठी नैतिकतेचे निकष समान असावेत, असं स्त्री चळवळ मानते. या मताशी आपण सहमत आहात का? हो नाही
भिन्नलिंगी लैंगिक संबंध असणारे स्त्री-पुरुष म्हणजे माणसं आणि उरलेल्यांना इतर समजून त्यांची उपेक्षा केली जात होती. आता मात्र LGBTIQA चळवळ आमची समलैंगिकता व वेगळी लैंगिक ओळख स्वीकारा आणि आम्हाला आमचे अधिकार द्या, अशी रास्त मागणी करते आहे. या चळवळीला मिळून साऱ्याजणी मासिकाचा भक्कम पाठिंबा आहे. या मागणीला आपला पाठिंबा आहे का? हो नाही सांगता येत नाही
२०१५ मध्ये सुरू झालेल्या हॅप्पी टू ब्लिड या चळवळीपासून मासिक पाळीविषयी अधिक खुल्या चर्चा होऊ लागल्या. मासिक पाळीचं रक्त दूषित असतं. त्यामुळे अशा स्त्रीचा विटाळ होतो, असं मानत स्त्रीला अस्पृश्य मानणं अवैज्ञानिक आहे. कारण मुलं होण्यासाठी आवश्यक असणारं ते निसर्गचक्र आहे. अनेक देवालय, मंदिरं यांच्याकडे गडगंज संपत्ती असते त्यापासून या कारणाने स्त्रियांना अलगदपणे धर्माच्या नावाखाली वगळलं जातं. हे पुरुषी अर्थकारण, राजकारण स्त्री चळवळींनी उघड पाडलं. पुजारी आणि अशा धार्मिक ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये स्त्रियांनाही सहभागी होण्याचा अधिकार आहे, असं स्त्री चळवळ आग्रहाने सांगते. मासिक पाळीत स्त्री अपवित्र वगैरे नसते या मताशी आपण सहमत आहात का? हो नाही
आपण मासिक पाळी काळात देवाची पूजा करता का? मंदिरात जाता का? हो नाही N.A
सत्यवान-सावित्री, महाभारत, रामायण, सत्यनारायणाची कथा, श्रावणी शुक्रवारची कथा आदि पौराणिक साहित्यातल्या कोणत्या व्यक्तिरेखा आपल्याला आवडतात? का? त्यांच्यासारखं व्हावं असं वाटतं का? हो नाही
गोंधळ, जागरण, गौरी पूजन, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी आदी उत्सवात सहभागी व्हायला आवडतं का?
हो नाही
स्त्रीवाद बहुआयामी, बहुमुखी आणि प्रवाही आहे; एकच एक स्त्रीवाद नाही तो स्त्रियांपुरता मर्यादितही नाही. सर्व शोषितांचा, वंचितांचा आणि दुर्बलांचा विचार करणारा, हिंसेला नकार देणारा सर्जनाला जपणारा, शांतीची मागणी करणारा, अखिल मानव जातीला कवेत घेणारा स्त्रीवाद हा दार्शनिक आहे. स्त्रीवाद वेगवेगळ्या विषमतांचा विचार विरोधापेक्षा संवादी पद्धतीनं करतो. स्त्रीवाद ही एक राजकीय भूमिका आहे, हे आपल्याला माहीत होतं का? हो नाही
स्त्रीवाद असा व्यापक असूनही स्त्री चळवळ घरं फोडणारी, स्वैराचाराला खतपाणी घालणारी चळवळ आहे, असा अपप्रचार केला जातो. हे आपल्याला माहीत आहे का? हो नाही
पितृसत्ताक, पुरुषप्रधान व्यवस्थेवर उभा असणारा विवाहाचा आजचा डोलारा खरा नाही, असं स्त्री चळवळ मानते. सहजीवन समता, स्वातंत्र्य, मैत्रभावावर आधारित पती-पत्नीचं सहजीवन हवं असा स्त्री चळवळीचा आग्रह आहे. हे आजच्या पती-पत्नीच्या सहजीवनात आहे, असं तुम्हाला वाटतं का? हो नाही
एकतर्फी स्त्रीच्या त्याग आणि सोशिकपणावर शोषणावर विवाहसंस्था उभी न राहता ती परस्पर सामंजस्य, तडजोड, एकमेकांचा सन्मान करणाऱ्या सहजीवनावर आधारित हवी, असं स्त्री चळवळ मांडते. ते आपल्याला मान्य आहे का? हो नाही
आपलं राहतं घर कुणाच्या नावाने आहे? स्वतः नवरा वडील भाऊ मुलगा
‘घर सर्वांचं तर घरकाम सर्वांचं’, असं स्त्री चळवळ मानते आपल्याला हे मान्य आहे का? हो नाही
मात्र, आज बहुतांश घरकाम स्त्रिया करतात. त्यामुळे गृहिणींना घरकामाला वेतन असावे का? हो नाही सांगता येत नाही
स्त्री चळवळ पुरुष विरोधी आहे, असं म्हणत तिची चेष्टा, टिंगल टवाळी होत असताना १९८६मध्ये पुरुष उवाच गट स्थापन झाला. आपली आई, बहीण, मुलगी, मावशी, आत्या या स्त्रियाच आहेत. त्यांच्या समस्या या आपल्याही समस्या आहेत. तसेच, या पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांना घाबरण्याची, रडण्याची बंदी आणि पैसे मिळण्याची सक्ती आहे. त्यामुळे पुरुषांवरही अन्याय होतो, म्हणून ही व्यवस्था बदलायला हवी. स्त्री प्रश्नांची दुसरी बाजू म्हणजे पुरुषप्रश्न आहे. पुरुषांची आक्रमकता, हिंसाचार, बलात्कार, व्यसनाधीनता, भावनिक तुटलेपण हे पुरुषप्रश्नाचे आविष्कार आहेत. पुरुषप्रश्न सोडवण्यासाठी स्त्री-पुरुष समता हवी, असं स्त्री चळवळ मानते आपल्याला हे मान्य आहे का?
हो नाही
पंचायत राजमध्ये ५० टक्के महिला आरक्षण आहे. मात्र, महत्त्वाची धोरणं ठरवणाऱ्या विधानसभा, लोकसभेत गेली २५ वर्षं महिला आरक्षणाचं बिल लटकलं होतं. आता ते संमत झालं असलं तरी अंमलबजावणीसाठी अजूनही दहा वर्षे लागतील. आपल्याला हे माहीत आहे का? हो नाही
मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरांवर स्त्रिया राजकारणात आल्या तर राजकारणाचा पोत सुधारेल असं आपल्याला वाटतं का? हो नाही सांगता येत नाही
स्त्री चळवळ घरापासून सुरू होत असल्यामुळे आणि पितृसत्ताक-पुरुषप्रधान व्यवस्थेची पाळंमुळं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, संस्कृतीकरण यामध्ये खोलवर रुजलेली असल्यामुळे ती अतिशय व्यापक आहे. थोडक्यात, धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न अपुरा आहे. त्यामुळे स्त्रीचळवळी संदर्भात आपल्याला अजून काही माहिती हवी असली तर खालीलपैकी कुणाही व्यक्तीशी आपण मोकळेपणाने संपर्क साधू शकता. या संदर्भात आपली टिप्पणी वेगळ्या पेपरवर नाव, संपर्क नंबर लिहूनही करू शकता. या पत्रातल्या प्रश्नांची उत्तरे देताना कंसात दिलेल्या पर्यायासमोर बरोबरची खूण करावी. आपल्या प्रतिसादाचा मनापासून आनंद झाला आहे. असाच संवाद साधत राहूया. आपण मिळून साऱ्याजणी मासिक वाचता का? नसल्यास ते वाचण्यासाठी जरूर मासिकाचे वर्गणीदार व्हा.
त्यासाठी ७४४७४४९६६४ या नंबरवर संपर्क साधू शकता. दिल से धन्यवाद!
आपले विश्वासू,
गीताली वि. मं.,
प्रकल्प प्रमुख.
मो. ९८२२७४६६६३
करुणा गोखले,
प्रमुख समन्वयक
मो. ९३२२७७००७३
अर्चना झेंडे,
समन्वयक
मो. ७३५०३३७१८६
जमीर कांबळे,
सल्लागार
मो. ९८३४५९४८७२